भरधाव कार थेट शेतात घुसली; सावलीत विसावा घेणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:43 IST2026-04-21T13:41:34+5:302026-04-21T13:43:07+5:30
रस्त्यापासून २० फूट दूर शेतात बसलेल्या कष्टकरी महिलेवर काळाची झडप; अर्धापूर तालुका हळहळला.

भरधाव कार थेट शेतात घुसली; सावलीत विसावा घेणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाचा घाला
अर्धापूर (जि. नांदेड): शेतात कष्ट करून दोन घास खाऊन विसाव्यासाठी बसलेल्या एका ३८ वर्षीय महिलेचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तामसा ते अर्धापूर मार्गावर घडली आहे. मंगलबाई साहेबराव शिंदे (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून थेट २० फूट दूर असलेल्या शेतातील आखाड्यात घुसल्याने हा अनर्थ ओढवला.
ताबा सुटला अन् काळ धावून आला
२० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही कार तामसाहून अर्धापूरकडे अत्यंत वेगाने जात होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याचा ताबा सोडला आणि ती शेतात घुसली. शेतातील कामे आटोपून आखाड्यात विसाव्यासाठी बसलेल्या मंगलबाई यांना या भरधाव कारने जोरदार धडक देऊन फरफटत नेले. या भीषण धडकेत मंगलबाई गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या होत्या.
उपचारादरम्यान मृत्यू
अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी तातडीने मंगलबाईंना स्वतःच्या वाहनातून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची झुंज अपयशी ठरली आणि सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.