निसर्गावर घाला! शिराढोण परिसरात माळरान पेटवले; जमिनीची सुपीकता, जैवविविधता धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:44 IST2026-05-05T16:43:38+5:302026-05-05T16:44:10+5:30
शिराढोणच्या माळरानावर पुन्हा आगीचा तांडव; तज्ज्ञांनी व्यक्त केला भविष्यातील पाणीटंचाईचा धोका.

निसर्गावर घाला! शिराढोण परिसरात माळरान पेटवले; जमिनीची सुपीकता, जैवविविधता धोक्यात
कंधार (जि. नांदेड): उन्हाळा सुरू झाला की गवत, कचरा आणि झुडपे जाळण्याची चुकीची प्रवृत्ती शिराढोण परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ४ मे रोजी घडलेल्या ताज्या घटनेत मोठ्या प्रमाणावर गवत आणि लहान झाडे जळून खाक झाली. ही कृती परंपरेच्या नावाखाली केली जात असली तरी, यामुळे पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होत आहे.
जैवविविधतेचा 'होळी'
या आगीमुळे केवळ गवतच जळत नाही, तर जमिनीतील सूक्ष्मजीव, कीटक आणि अनेक पक्ष्यांची घरटी नष्ट होत आहेत. माळरान जळाल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटते आणि जमिनीची सुपीकता कमी होते. पर्यावरणाचा हा ऱ्हास भविष्यात उष्णतेत वाढ आणि पाण्याची भीषण टंचाई निर्माण करू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रशासनाची निष्क्रियता?
पर्यावरण संरक्षणाचे कायदे असूनही अशा घटनांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जनजागृतीसह कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने होत आहे.
पर्यावरणीय संतुलन धोक्यात
"माळरान जाळल्यामुळे निसर्गावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. जमिनीची सुपीकता घटते आणि सूक्ष्मजीव नष्ट झाल्याने संपूर्ण पर्यावरणीय संतुलन धोक्यात येते. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन कठोर नियमांची अंमलबजावणी करावी."
— प्रा. लक्ष्मण बोंदकुले, पर्यावरणप्रेमी.