'त्या' दोन निष्पाप चिमुकलींना कधी मिळणार न्याय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:06 IST2026-05-04T18:05:49+5:302026-05-04T18:06:51+5:30
Nagpur : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या-ही केवळ एक गुन्ह्याची नोंद नाही, तर संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी घटना आहे.

When will 'those' two innocent little girls get justice?
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या-ही केवळ एक गुन्ह्याची नोंद नाही, तर संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी घटना आहे. आईवडिलांच्या अंगाखांद्यावर खेळण्या-बागडण्याचे वय असणाऱ्या मुलीच्या हत्येच्या घटनेनंतर राज्यभर संताप उसळला, आरोपी भीमराव कांबळेला फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, या घटनेमुळे विवेक जागृत असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात २००८ व २०१९ च्या दोन अत्याचाराच्या घटनांच्या वेदना ताज्या झाल्या आहेत. दोन्ही प्रकरणातील नराधम आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा तर सुनावली. मात्र, अद्यापपर्यंत त्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. कायद्यातील पळवाटांचा वापर करून आरोपींकडून 'तारीख पे तारीख' सुरू असून त्या दोन निष्पाप कळ्यांना न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.
२००८ मध्ये वसंता दुपारे या नराधमाने चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली होती. त्या निष्पाप जिवाच्या किंकाळ्या आजही समाजाच्या कानात घुमत आहेत. न्यायालयांनी या क्रूरकर्याला फाशीची शिक्षा सुनावली. आरोपी फाशी टाळण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेदेखील त्याच्यावर शिक्कामोर्तब केले.
२०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची पुनर्विचार याचिका फेटाळली होती. राष्ट्रपतींनीदेखील दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर दुपारेने परत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत व कलम ३२ च्या निकषांनुसार न्यायालयाने निकालावर पुनर्विचार करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अद्यापही याबाबत अंतिम निर्णय आलेला नाही व मृत चिमुकलीचे नातेवाईक अद्यापही न्यायालयाकडे न्यायासाठी डोळे लावून आहेत.
तिहेरी फाशी, अंमलबजावणीसाठी प्रतीक्षाच ?
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील लिंगा शिवारातील शेतात ८ डिसेंबर २०१९ रोजी पीडित मुलीचा मृतदेह आढळला होता. क्रूरकर्मा संजय पुरी (३७) याने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. ती वेदनांनी ओरडत असताना राक्षसी वृत्तीच्या संजय पुरीने दगडाने डोके ठेचून तिची निघृण हत्या केली. क्रूरकर्मा संजय पुरीच्या क्रौर्याला बळी पडलेल्या चिमुकलीचा मृतदेह रात्रभर तसाच पडून राहिला. २०२४ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात २७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. न्यायालयाने पुरीला तिहेरी फाशी सुनावली होती. मात्र, फाशीची शिक्षा झाली असली तरी त्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही व कायद्यातील पळवाटा काढून पुरीदेखील नराधम वसंता दुपारेप्रमाणे वेळकाढूपणा करण्याची शक्यता आहे.
फाशी टाळण्यासाठी विविध कारणे
'कोल्ड ब्लडेड मर्डर' करूनदेखील सुधारण्याची संधी द्यावी, असे म्हणत वसंता दुपारेने फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. फाशी टाळण्यासाठी अगोदर त्याच्या वयाचे कारण देण्यात आले. त्यानंतर त्याच्या शिक्षणावर भाष्य करण्यात आले. तो पदवी परीक्षेचा अभ्यास करत होता व गांधीविचार तसेच तत्त्वज्ञान कार्यशाळांमध्ये तो सहभागी झाला होता, तो उत्तम चित्रकार आहे अशी कारणेदेखील त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर दिली होती.