तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:27 IST2026-05-05T16:27:16+5:302026-05-05T16:27:57+5:30
राजारहाट न्यू टाउन विधानसभा निकाल २०२६: ३० तासांच्या मोजणीनंतर भाजपचे पीयूष कनोडिया ३१६ मतांनी विजयी. बंगालमध्ये भाजपच्या २०७ जागा.

तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २४ तास उलटले तरी एका जागेवरील चुरस संपता संपत नव्हती. अखेर ३० तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'राजारहाट न्यू टाउन' मतदारसंघाचा निकाल हाती आला असून, येथे भाजपने टीएमसीच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. या विजयामुळे बंगालमधील भाजपचा आकडा आता २०७ वर पोहोचला.
रात्रभर धडधड, दुपारी गुलाल!
सोमवारी बंगालमधील २०६ जागा जिंकून भाजपने सत्ता काबीज केली होती, पण राजारहाट न्यू टाउन या एका जागेवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. १८ फेऱ्यांपर्यंत चाललेल्या या मोजणीत प्रत्येक मतासाठी संघर्ष पाहायला मिळाला. अखेर मंगळवारी दुपारी चित्र स्पष्ट झाले. भाजपचे उमेदवार पीयूष कनोडिया यांनी टीएमसीचे दिग्गज नेते तपश चटर्जी यांचा अवघ्या ३१६ मतांनी पराभव केला. कनोडिया यांना १,०६,५६४ मते मिळाली, तर चटर्जी १,०६,२४८ मतांवर अडकले.
ममतांची १५ वर्षांची 'सत्ता' एक्झिट
२०११ मध्ये वामपंथीयांना सत्तेतून खेचून ममता बॅनर्जी सत्तेत आल्या होत्या. सलग १५ वर्षे बंगालवर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या दीदींना २०२६ च्या या लाटेने मोठा धक्का दिला आहे. २०२१ मध्ये २१५ जागा जिंकणाऱ्या टीएमसीला आता विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. दुसरीकडे, ७७ जागांवरून थेट २०७ जागांपर्यंत मजल मारत भाजपने बंगालमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक सरकार स्थापन केले आहे.
'बदला' नको 'बदल' हवा; मोदींचा हुंकार
बंगालच्या या अभूतपूर्व विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे आनंदी आहेत. विजयानंतर संवाद साधताना ते म्हणाले, "बंगालमध्ये आता हिंसेचे राजकारण थांबले पाहिजे. आम्हाला 'बदला' नको तर 'बदल' हवा आहे. गंगा नदी गंगोत्रीपासून बिहारमार्गे गंगासागरपर्यंत जाते, आज खऱ्या अर्थाने गंगोत्री ते गंगासागरपर्यंत फक्त 'कमळच' फुलले आहे." कोणी कोणाला मतदान केले यापेक्षा आता बंगालच्या विकासासाठी एकत्र येणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजारहाटमधील निकालाचे विशेष महत्त्व
राजारहाट न्यू टाउनची जागा भाजपने जिंकणे हा टीएमसीसाठी मोठा मानसिक धक्का मानला जात आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते श्वास रोखून धरून होते. या विजयाने बंगालमधील भाजपच्या सत्तेवर आता अधिकृत मोहोर उमटवली आहे.