राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:46 IST2026-05-05T15:39:58+5:302026-05-05T15:46:58+5:30
Rahul Gandhi Latest news Marathi: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेस आणि इतर मित्रपक्षातील नेते, कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुनावले.

राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
"हे संकुचित राजकारण बाजूला ठेवा. हा निकाल कोणत्याही एक किंवा दोन पक्षाबद्दलचा नाहीये. ही भारताबद्दलची घटना आहे", असे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील आणि इतर मित्रपक्षातील नेत्यांचे कान टोचले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील काही नेते-कार्यकर्ते आणि इतर समविचारी पक्षातील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यावरून राहुल गांधींनी संताप व्यक्त केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक पोस्ट केली आणि कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
हे भाजपाचे लोकशाही संपवण्याचे दिशेने मोठे पाऊल
राहुल गांधी म्हणाले, "काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षांतील जे काही लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवामुळे आनंदित झाले आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजेत की, आसाम आणि पश्चिम बंगालमधील बहुमत चोरलेले आहे. भाजपाचे हे भारतीय लोकशाही संपवण्याच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे."
यापूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर जागा चोरल्याचाही आरोप केला आहे. भाजपाने निवडणूक आयोगाची मदत घेऊन १०० जागा पश्चिम बंगालमध्ये चोरल्या असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
"आसाम आणि पश्चिम बंगाल ही ढळढळीत उदाहरणे आहेत की, भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने ही निवडणूक चोरली आहे. आम्ही ममता बॅनर्जी यांच्याशी सहमत आहोत. बंगालमध्ये १०० पेक्षा जास्त जागा चोरण्यात आल्या आहेत", असे राहुल गांधी म्हणालेले.
Some in the Congress, and others, are gloating about TMC’s loss.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 5, 2026
They need to understand this clearly - the theft of Assam and Bengal’s mandate is a big step forward by the BJP in its mission to destroy Indian democracy.
Put petty politics aside. This is not about one party or…
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी अमित शाहांवर
२०७ जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमत मिळवलेल्या भाजपाने मुख्यमंत्री निवडीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. पक्षाच्या संसदीय मंडळाने पक्षाचा विधिमंडळ नेता निवडीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे सह-निरीक्षक आहेत.