पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 16:34 IST2026-05-05T16:32:35+5:302026-05-05T16:34:37+5:30
Pakistan Reaction Over BJP Win West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाची जगभरात चर्चा असून, पाकिस्तानातील काही राजकीय तज्ज्ञांनी युद्धाची भाषा सुरू केल्याचे म्हटले जात आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Pakistan Reaction Over BJP Win West Bengal Election 2026: प. बंगाल विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी १५ वर्षांपासूनचे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचे सरकार पायउतार करीत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून राज्यात ठराविक काळानंतर सत्तापालट घडवून आणारी एकतर्फी निवडणुकीची परंपरा कायम राखली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला तब्बल २०६ जागा मिळाल्या. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयाची चर्चा जगभरात होताना पाहायला मिळत आहे. यातच पाकिस्तानने युद्धाचा उल्लेख करत एक प्रकारे इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपाच्या ऐतिहासिक विजयावर पाकिस्तानी पत्रकार आणि राजकीय तज्ज्ञ प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानी संरक्षण विश्लेषक कमर चीमा यांनी तर एक चिथावणीखोर विधान केले आहे. भारताचा नकाशा भगवा रंगवला गेला आहे, मोदींचा प्रचार जिंकला आहे. आता भारत-पाकिस्तान युद्ध विनाशकारी ठरेल. नरेंद्र मोदी आणि भाजप भारताच्या ७२ टक्के भूभागावर आणि ७८ टक्के लोकसंख्येवर नियंत्रण ठेवतात. याचा अर्थ असा की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध कोणीही थांबवू शकत नाही. युद्ध, राष्ट्रवाद, धर्म ही त्यांची ताकद आहे. भाजपाने स्वतःला अधिक मजबूत केले आहे. आता आपण हे समजून घेतले पाहिजे की, भारतासोबतचे आपले युद्ध जिथे संपले, तिथूनच पुन्हा सुरू होईल, असा दावा चीमा यांनी केला आहे.
पाकिस्तान आता कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना कडवी झुंज देईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक 'लाट' बनले आहेत. त्यांची गोष्ट जनतेमध्ये लोकप्रिय झाली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताकडून आपल्या देशाचा दारूण पराभव झाल्याबद्दल त्यांनी खोटा दावा केला आणि म्हटले की, पाकिस्तानला आता हे कळून चुकले आहे की, ते पंतप्रधान मोदींना हवे ते करू देणार नाही. पाकिस्तान म्हणतो की ते आता कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदींना कडवी झुंज देईल, असा दावा चीमा यांनी केला.
दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार अर्झू काझमी यांनीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि बंगालमधील भाजपाच्या विजयावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्झू काझमी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी अशी जादू केली की, बऱ्याच काळापासून जिंकत असलेल्या ममता बॅनर्जी पूर्णपणे एकाकी पडल्या.