तीन कोटी फेक अकाउंट डिलिट; तरीही रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांचा सुळसुळाट
By नरेश डोंगरे | Updated: May 4, 2026 20:09 IST2026-05-04T20:09:00+5:302026-05-04T20:09:37+5:30
Nagpur : भारतीय रेल्वेच्या रिझर्व्हेशन काऊंटरवर ऑनलाइन आणि ऑफलाइन कब्जा मारणाऱ्या दलालांकडून रेल्वे प्रवाशांची बिनबोभाट लूट केली जात आहे.

Three crore fake accounts deleted; Still, those involved in black marketing of railway tickets are thriving
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय रेल्वेच्या रिझर्व्हेशन काऊंटरवर ऑनलाइन आणि ऑफलाइन कब्जा मारणाऱ्या दलालांकडून रेल्वे प्रवाशांची बिनबोभाट लूट केली जात आहे. या लुटमारीकडे रेल्वे प्रशासन आणि कारवाईचा अधिकार असणाऱ्या यंत्रणांनी 'साळसुदपणे दुर्लक्ष' केल्यामुळे यंत्रणांची ही बेफिकरी आहे की, दलालांसोबत त्यांची मिलीभगत, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी ऑनलाइनचा वापर करताच 'जाम'चा अनुभव अपवाद वगळता प्रत्येकच प्रवाशाला नियमित येतो. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गैरप्रकाराकडे रेल्वे बोर्डाने गेल्या वर्षी नजर फिरवली. दलालांचे रॅकेट ही लुटमार करीत असल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेने देशभरातील सुमारे ३ कोटी फेक अकाउंट्स ब्लॉक करून आयआरसीटीसीच्या प्लॅटफॉर्मवरून हटवले. दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यावेळी सांगितले होते. शिवाय तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले. तसेच, थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मसाठी तत्काळ बुकिंग विंडो ३० मिनिटांनंतरच उघडण्यात येईल, असा नियम करण्यात आला. या सर्व प्रकारानंतर गरजू प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळणे सुलभ होणार असल्याचे दावे रेल्वेकडून केले जात होते. मात्र, ते फोल ठरले. अजूनही प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळणे दुरापास्त आहे. दलालांकडे जादा पैसे दिल्यास हमखास आरक्षित तिकीट मिळते. अर्थात, रेल्वेच्या तिकीट काऊंटरऐवजी दलालांकडे गेल्यास तिकीट मिळत असल्याने दलालांचा रेल्वेतील प्रभाव आणि सुळसुळाट अधोरेखित होत आहे.
५० पेक्षा जास्त दलाल सक्रिय
दलालांकडून रेल्वेची ई-तिकिटे काढण्यासाठी पर्सनल युजर आयडीचा गैरवापर केला जातो. एकच दलाल त्याच्या, नातेवाईक आणि मित्रांच्या पर्सनल युजर आयडीवरून तिकिटे काढतो. या अवैध व्यवहाराची रक्कम जमा करण्यासाठीही नातेवाइकांच्या बँक खात्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रात हा गोरखधंदा सर्वत्र बिनबोभाट सुरू आहे. एकट्या नागपुरात अशाच प्रकारे ५० पेक्षा जास्त दलाल सक्रिय आहेत.
कारवाईचा नुसताच फार्स
दलालांचा सुळसुळाट सर्वत्र असताना, अधूनमधून एखादी कारवाई होताना दिसते. गेल्या वर्षी बुलडाणा जिल्ह्यात ई-तिकिटांच्या काळाबाजारीचे रॅकेट चालविणारे टोळके रेल्वे प्रशासनाने पकडले. या रॅकेटचे मुंबईच्या दलालांशी लागेबांधे असल्याचेही त्यावेळी उघड झाले. मात्र, नंतर त्यात काय झाले, ते स्पष्ट होऊ शकले नाही. गेल्या चार महिन्यांत फक्त दोन दलाल (एप्रिलमध्ये) पकडण्याच्या कारवाया नागपुरात झाल्या. कारवाईनंतर अनेक वेळा दलालांची नावे उजेडात येणार नाही, याची खास काळजी घेतली जाते. त्याचमुळे यंत्रणेतील मंडळींची दलालांसोबत अभद्र युती असल्याचा संशय घेतला जात आहे.
अधिकारी म्हणतात...
या संबंधाने अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता गाड्यांमधील गर्दी वाढल्याने रिझर्व्हेशन मिळत नाही, असे सांगून दलालांची माहिती मिळाल्यास आमच्याकडून तत्काळ कारवाई केली जाते, असे अधिकारी म्हणतात.