रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्रासह तीन राज्यात विशेष मोहीम
By नरेश डोंगरे | Updated: April 18, 2026 20:26 IST2026-04-18T20:25:42+5:302026-04-18T20:26:56+5:30
निष्पाप हातांची घातक चूक : रुळांवरचा दगड ठरू शकतो भीषण अपघाताचा ‘सायलेंट ट्रिगर’

Special campaign in three states including Maharashtra to prevent railway accidents
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे लाईन शेजारी राहणारे मुलं रेल्वे रुळावर मोठे दगड, लोखंडी किंवा दुसऱ्या धोकादायक वस्तू ठेवतात. त्यातून रेल्वेचा भीषण अपघात होऊ शकतो, याची कल्पना नसल्यामुळे ही मुले हा गंभीर गुन्हा करतात. त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने विशेष मोहिमाती घेतली आहे. त्यानुसार नागपूरमहाराष्ट्रासह, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यात विविध उपक्रमाचे आयोजन करून शाळकरी मुले आणि पालकांचे समुपदेशन केले जात आहे.
रेल्वे रुळांवर लोखंड, लाकूड, दगड ठेवणे किंवा धावत्या गाड्यांवर दगडफेक करणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकारांमुळे मोठ्या रेल्वे अपघाताचा धोका असतो. यापुर्वी अनेक ठिकाणी घडलेल्या अशा घटनांमध्ये 'बहुतेक वेळा रेल्वे रुळांजवळील शाळा, गाव किंवा वसाहतीतील मुले खेळाच्या किंवा उत्सुकतेपोटी हा गंभीर गुन्हा करतात. यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याबरोबरच रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते, याची त्यांना कल्पना नसते', असे विश्लेषण तपासातून पुढे आले आहे. ते लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाच्या आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी अधिनस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक विशेष जनजागृती मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, नागपूर विभागातील आरपीएफचे सर्व निरीक्षक, प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली 'कम्युनिटी पोलिसिंग आऊटरीच' सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत रेल्वे रुळांलगतच्या परिसरातील शाळा, गाव आणि वस्तीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, पालकांशी आणि ग्रामप्रमुखांशी संवाद साधला जात आहे.
मुलांना रेल्वे रुळांवर अडथळे ठेवणे किंवा गाड्यांवर दगडफेक केल्याने होणारे जीवित व आर्थिक नुकसान तसेच त्याचे कायदेशीर परिणाम समजावून सांगण्यात येत आहेत. पालक व शिक्षकांनाही मुलांवर लक्ष ठेवण्याचे, त्यांना रेल्वे परिसरापासून दूर ठेवण्याचे आणि अशा कृतींमुळे त्यांच्या भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते, याची कल्पना देऊन त्यांना सावध केले जात आहे.
स्पर्धा आणि पुरस्कारही
मुलांचा सहभाग वाढवण्यासाठी क्रिकेट, बुद्धिबळ, धावणे, चमचा-दौड, ट्रे-पासिंग यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षिसे आणि खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. या दरम्यान मुलांचे समुपदेशन करून त्यांना या गंभीर धोक्यांविषयी जागरूक केले जात आहे.
जनजागृतीला प्रारंभ
१६ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत सावनेर पब्लिक स्कूल, सिंधु हायस्कूल (पांचपावली, नागपूर), शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी, तसेच बालाघाट, छिंदवाडा, मंडला आणि राजनांदगाव परिसरातील शाळा तसेच गावांमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
समाजकंटकावर लक्ष ठेवा
आरपीएफने या मोहिमेअंतर्गत नागरिक, पालक, शैक्षणिक संस्था आणि रेल्वे प्रवाशांना आवाहन करून अशा प्रकारच्या घटना किंवा संशयीत व्यक्ती आढळल्यास तात्काळ आरपीएफ पोस्टला किंवा रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.