नागपूर - मुंबईतील २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटाचा आरोपी दहशतवादी कमाल अहमद मोहम्मद वकिल अंसारी (वय ५०) याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत २००६ साली लोकलमध्ये आरोपी कमाल अहमद आणि त्याच्या साथीदारांनी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणली होती. त्यात अनेकांचे जीव गेले तर कित्येकांना जीवघेण्या जखमा झाल्या. अनेक जणांना अपंगत्वही आले होते. आरोपी कमालला या प्रकरणात न्यायालयाने २०१५ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.
आरोपी अंसारीला काही दिवस मुंबई कारागृहात ठेवल्यानंतर त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. येथे तो फाशी यार्डात बंदिस्त होता. त्याला ९ एप्रिलला कोरोना झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी १ वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाची सूचना कारागृह प्रशासन आणि धंतोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे
आणखी तीन बाधितकोरोनाची बाधा झाल्यामुळे मध्यवर्ती कारागृहातील फाशीच्या तीन कैद्यांसह १३ कैद्यांवर गेल्या दोन आठवड्यांपासून उपचार सुरू आहेत. त्यांची सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले.