भाजपचा 'नारी शक्ती'चा नारा म्हणजे केवळ मनुवादाचा अजेंडा ! नागपुरातून नाना पटोलेंचा भाजपवर 'घणाघात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:05 IST2026-04-18T16:03:51+5:302026-04-18T16:05:16+5:30
Nagpur : देशातील संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी जाईल, त्याला काँग्रेसचा ठाम विरोध असेल. भाजप सध्या जनगणना टाळून आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली 'मनुवाद' लादण्याचा प्रयत्न करत आहे.

BJP's slogan of 'Nari Shakti' is just a Manuwad agenda! Nana Patole's 'severe attack' on BJP from Nagpur
नागपूर: देशातील संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी जाईल, त्याला काँग्रेसचा ठाम विरोध असेल. भाजप सध्या जनगणना टाळून आणि महिला आरक्षणाच्या नावाखाली 'मनुवाद' लादण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र काँग्रेस हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही,अशा कडक शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महिला आरक्षण, जातीनिहाय जनगणना, अशोक खरात प्रकरण आणि राहुल गांधींवरील आरोपांवरून सरकारला धारेवर धरले.
महिला आरक्षणाचा बनाव आणि मनुवादाचा धोका
पटोले म्हणाले की, २०२३ मध्ये जेव्हा महिला आरक्षणाचे बिल आले, तेव्हा जनगणना करून जागा वाढवू असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, २०२१ ची जनगणना कोरोनाचे कारण पुढे करून जाणीवपूर्वक टाळण्यात आली. घराचा सर्व्हे करून मग जनगणना करू, हा केवळ खोटारडेपणा आहे. भाजपला महिलांचा सन्मान करायचा नसून, ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षणापासून दूर ठेवायचे आहे. हाच खरा मनुवाद आहे," असा आरोप त्यांनी केला.
अशोक खरात यांचे ईपस्टीन होईल' – खळबळजनक दावा
अशोक खरात प्रकरणावर बोलताना पटोले यांनी गंभीर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, अशोक खरात हा सरकारचा प्यादा आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी जितेंद्र शेळकेची हत्या करण्यात आली. आता खरातलाही जेलमध्ये मारले जाण्याची भीती आहे. मध्य प्रदेशातील 'व्यापम' घोटाळ्याप्रमाणेच या प्रकरणातही साक्षीदार आणि आरोपींचे अपघात घडवले जात आहेत. राजकीय लोकांवर अद्याप गुन्हे का दाखल झाले नाहीत? असा सवाल त्यांनी गृहखात्याला विचारला.
जातीनिहाय जनगणना आणि उपवर्गीकरण
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे सांगितले. "बदर समितीचा अहवाल जनतेसमोर मांडावा. शोषित आणि पीडित समाजावर अन्याय करून विशिष्ट जातींना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही. क्रिमीलेअरच्या नावाखाली आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असेही ते म्हणाले.
"भाजप सध्या जाती-जातीत विष पेरण्याचे काम करत आहे. कधी मराठा विरुद्ध ओबीसी, तर कधी एका धर्माला टार्गेट करून अदानींसोबतचे व्यवहार लपवले जात आहेत. राज्याला विकण्याचे काम सुरू असून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी 'पिलांटू' सोडले जात आहेत."
- नाना पटोले,काँग्रेस