शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येतो? जाणून घ्या, सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:14 IST2026-01-28T14:12:11+5:302026-01-28T14:14:15+5:30
What is State Mourning Ajit Pawar Death Plane Crash News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यात ३ दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येतो? जाणून घ्या, सविस्तर
What is State Mourning, Ajit Pawar Death Plane Crash News:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये येत होते. त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना, लँडिंगवेळी अपघात झाला आणि विमान शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. यावर प्रतिक्रिया देताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला. जाणून घेऊया, शासकीय दुखवटा म्हणजे काय?
शासकीय दुखवटा म्हणजे काय? (What is State Mourning)
महाराष्ट्र शासनातर्फे आज शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्यासाठी किंवा राष्ट्रासाठी शोक व्यक्त करण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग म्हणजे शासकीय दुखवटा. शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर राज्यात किंवा देशातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येतो. या कालावधीमध्ये कोणतीही सरकारी कार्यक्रम, घोषणा केली जात नाही. तसेच कोणतेही मेळावे आणि सभा घेण्यात येत नाहीत. कोणतेही मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम केले जात नाहीत. निधन झालेल्या व्यक्तीचे शासकीय सन्मानाने अत्यंसंस्कार केले जातात. अंत्ययात्रेच्या वेळी निधन झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर देशाचा राष्ट्रध्वज ठेवला जातो. अंत्यसंस्कारपूर्वी राष्ट्रध्वज काढून सन्मानपूर्वक व्यक्तीच्या नातेवाईतांकडे सुपूर्द केला जातो. निधन झालेल्या व्यक्तीला लष्करी सन्मानात मानवंदना देण्यात येते. यावेळी पोलिस दलाकडून बंदुकीतून हवेत गोळ्या झाडून सलामी दिली जाते.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.