Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:11 IST2026-05-18T12:07:21+5:302026-05-18T12:11:39+5:30
Twisha Sharma Death: विवाहिता ट्विशा शर्माच्या मृत्यूने तिचे कुटुंबीय हादरले. ट्विशाचा पती आणि सासरच्यांकडून छळ सुरू होता. त्यालाच कंटाळून तिने आयुष्य संपवले. त्यापूर्वी ट्विशाने तिच्या मैत्रिणीला मेसेज केला होता.

Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
Twisha Sharma News: चारित्र्यावर संशय आणि कौटुंबिक हिंसाचारामुळे आणखी एक विवाहितेचा जीव गेला. भोपाळमध्ये ट्विशा शर्माचा मृत्यू झाला. पण, तिने आत्महत्या केली की, तिची हत्या करण्यात आली, याबद्दल आता शंका उपस्थित होत आहे. ट्विशाने पतीसह सासरच्या लोकांकडून होत असलेला छळ तिच्या आईला सांगितला होता. तिच्या मृत्यूपूर्वी तिने मैत्रिणीलाही मेसेज करत मी लग्न करून फसले, तू यात अडकू नकोस असा मेसेज केला होता.
ट्विशा शर्माच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबियांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. ही घटना घडण्याच्या काही दिवस आधी ट्विशाने तिची मैत्रीण मीनाक्षीला मेसेज केले होते. तिने मीनाक्षीला लग्न करू नको, असे म्हटले होते.
मी अडकलेय यार, तू नको अडकू; तो मेसेज ठरला शेवटचा
ट्विशा शर्माचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पण, तिची कट रचून हत्या केली गेल्याचा आऱोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. ट्विशाच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी सांगितले की, आमचं बोलणं झालं होतं.
ट्विशा मेसेज करून म्हणाली होती की, मी अडकले आहे यार, तू नको अडकू. आता जास्त बोलू शकत नाही. तुला योग्य वेळी कॉल करेन.
त्यावर मिनाक्षी तिला म्हणालेली की, मला तुझी काळजी वाटत आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबत आहे.

ट्विशा आई वडिलांना म्हणालेली, हे लोक मला जगू देणार नाही
मयत ट्विशाचा समर्थ सिह याच्यासोबत २०२५ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर तो तिला चारित्र्यावर संशय घेऊन छळत होता. तिला होत असलेला त्रास तिने आईला सांगितला होता. तिचा मृत्यू होण्याच्या पाच दिवस आधी ट्विशाने आईला व्हॉट्सअपवर मेसेज करून मला घेऊन जा असे म्हटले होते.
'मी खूप त्रासून गेले आहे. हे लोक खूप वाईट आहेत. सतत संशय घेत असतात. समर्थ मला विचारतो की, माझ्या पोटात असलेले मूल कोणाचे आहे? येऊन मला घेऊन जा. हे लोक मला जगू देणार नाहीत', असा मेसेज ट्विशाने तिच्या आईवडिलांनाही केला होता.
पाच महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न
नोएडामध्ये राहणाऱ्या ट्विशा शर्मा हिचे डिसेंबर २०२५ रोजी भोपालमधील सेवानिवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांचा वकील मुलगा समर्थ सिंह यांच्यासोबत लग्न झाले होते.
दोघेही मॅट्रिमोनियल साईटवर भेटले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. पण, लग्नानंतर काही महिन्यानंतरच तिला त्रास देणे सुरू झाले. लग्नानंतर ट्विशाचा गर्भपात झाला होता. तर १२ मे रोजी रात्री कटारा हिल्समधील घरात तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
तिचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे पोस्टमार्टेममध्ये स्पष्ट केले आहे. मात्र, तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या अनेक जखमाही आढळून आल्या आहेत. मागील सात दिवसांपासून ट्विशाचा मृतदेह भोपाळच्या एम्स रुग्णालयात आहे. दरम्यान, ट्विशाचे आईवडील, भाऊ हे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहेत.