"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:19 IST2026-05-18T12:18:39+5:302026-05-18T12:19:39+5:30
अल्पसंख्याक समाजासंदर्भात बोलताना जॉर्ज म्हणाले, भारतात प्रत्येक अल्पसंख्याक समुदाय सुरक्षित आणि आनंदाने राहतो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात अल्पसंख्यकांची लोकसंख्या ११ टक्के होती, जी आज २० टक्के पार गेली आहे."

"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
देशातील प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांमध्ये घसरण झाल्याचे आरोप भारताने रविवारी पूर्णपणे फेटाळून लावले. भारत हा एक जिवंत लोकशाही असलेला देश आहे. येथे प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी आहे, असे भारताने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय नेदरलँड दौऱ्यावर होते. त्यावेळी तेथील पंतप्रधान रॉब जेटेन यांनी, भारतातील कथित परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, परराष्ट्र मंत्रालयाचे (पश्चिम) सचिव सीबी जॉर्ज यांनी स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सीबी जॉर्ज म्हणाले, "हा प्रश्न विचारणाऱ्याच्या समजेच्या आभावामुळे आम्हाला उत्तर द्यावे लागत आहे. भारत हा १.४ अब्ज लोकसंख्या असलेला देश आहे. या देशाची संस्कृती ५ हजार वर्षं जुनी आहे. येथे प्रचंड विविधता आहे. जगात असा एकही देश नाही, जेथे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मांसारखे अनेक धर्म उदयाला आले असतील. ते आजही येथे वाढत आहेत." एवढेच नाही तर, भारत कदाचित मोजक्या देशांपैकी एक आहे, जेथे ज्यू समाजाला कधीही छळाला सामोरे जावे लागले नाही, असेही जॉर्ज यांनी सांगितले.
स्वातंत्र्यावेळी ११% असलेले अल्पसंख्याक आज २०% पार! -
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा हवाला देत जॉर्ज म्हणाले, "भारताने लोकशाही मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. मात्र तरीही आर्थिक यश मिळवले. आम्ही गरिबीवर मात करण्यासाठी हिंसेचा नव्हे तर लोकशाहीचा मार्ग निवडला. आम्ही जगाच्या लोकसंख्येचा एक षष्ठांश भाग आहोत. मात्र, जगातील समस्यांचा भाग नाही. हेच भारताचे सौंदर्य आहे." अल्पसंख्याक समाजासंदर्भात बोलताना जॉर्ज म्हणाले, भारतात प्रत्येक अल्पसंख्याक समुदाय सुरक्षित आणि आनंदाने राहतो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात अल्पसंख्यकांची लोकसंख्या ११ टक्के होती, जी आज २० टक्के पार गेली आहे."
दरम्यान, पंतप्रधानांच्या दौर्यात, पंतप्रधान मोदी आणि डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्यात धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर आणि विविध करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. तसेच, भारतासाठी नेदरलँड हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.