नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:18 IST2026-05-18T18:18:03+5:302026-05-18T18:18:36+5:30
पालघरमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला.

नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Palghar Accident: पालघरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी गावानजीक एका विवाहसोहळ्याचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, महामार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकीलाही या वाहनांनी चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोन प्रवाशांसह ट्रक मधील १० अशा १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे वऱ्हाड डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून धानिवरी येथील खडकीपाडा भागात एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. आयशर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच १०० हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. वऱ्हाडाचा हा ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचलाच होता, तितक्यात मुंबई वाहिनीवरून येणाऱ्या एका वेगवान कंटेनरने ट्रकला भीषण धडक दिली.
कंटेनर खाली दबले वऱ्हाडी
प्रत्यक्षदर्भांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक एवढी तीव्र होती की कंटेनरचा पुढचा केबिनचा भाग मुख्य बॉडीपासून वेगळा झाला आणि तो थेट वऱ्हाडाच्या आयशर ट्रकवर जाऊन कोसळला. यामुळे ट्रकमध्ये बसलेले अनेक लोक कंटेनरच्या वजनाखाली गेले. त्यातच एक दुचाकीही या वाहनांच्या कचाट्यात आली अन् दोघांचा जागीच चेंदामेंदा झाला