रुईच्या माळरानावर अजितदादांसाठी जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रावहिनी स्वत: जायच्या, काय आहे किस्सा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 17:56 IST2026-01-31T17:55:15+5:302026-01-31T17:56:03+5:30
लग्नानंतर ५ वर्षात अजितदादांचे राजकारण विस्तारत गेले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर पडली.

रुईच्या माळरानावर अजितदादांसाठी जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रावहिनी स्वत: जायच्या, काय आहे किस्सा?
मुंबई - राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. लोकभवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सुनेत्रा पवार शपथविधीला उभ्या राहताच सर्व आमदारांनी अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या. अजित पवारांच्या अकाली निधनाने राज्यातील राजकारणाचं चित्र बदलले. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री राज्याला लाभल्या. अत्यंत शोकाकुल परिस्थितीतून स्वत:ला सावरत सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाती घेतली आहेत.
धाराशिव येथील स्वातंत्र्य सैनिकांची लेक असलेली सुनेत्रा पवार यांना लहानपणापासून राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे त्यांचे बंधू असून लहानपणापासून त्यांनी जवळून राजकारण पाहिले आहे. बी.कॉम पदवीधर असलेल्या सुनेत्रा पवार यांना शिक्षणासोबत पेटिंग, संगीत, फोटोग्राफी आणि शेती या विषयात रस आहे. त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या नेहरु सेंटरमध्येही झाले आहे. अजित पवारांसोबत लग्नानंतर त्या काटेवाडीतील शेतीत रमल्या. तात्यासाहेबांची सून आणि अजितदादांची बायको म्हणून सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी, कण्हेरी येथील शेतकऱ्यांच्या संपर्कात आल्या. शेतीशिवाय पोल्ट्रीमध्येही त्यांनी लक्ष घालून १० हजार पक्षांची पोल्ट्री १ लाखावर नेली.
लग्नानंतर ५ वर्षात अजितदादांचे राजकारण विस्तारत गेले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर पडली. १९९१ साली अजितदादा खासदार झाले आणि त्यानंतर अवघ्या ३ महिन्यातच आमदार झाले, मंत्रीही झाले. त्यामुळे सुनेत्रा पवार मुंबईत राहायला आल्या. याच काळात बारामती येथे विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी उभारणीचं काम सुरू होते. त्यावेळी अजितदादा बऱ्याचदा रुईच्या माळरानावर ठाण मांडून असायचे. त्यावेळी अजितदादांचा दुपारचा जेवणाचा डबा घेऊन सुनेत्रा पवार तिथे यायच्या, त्यामुळे विद्यानगरीच्या बांधकामात त्या साक्षीदार झाल्या. रुई आणि परिसरातील जनतेशी त्यांना जवळून संपर्क आला.
दरम्यान, २००२ पर्यंत काटेवाडी गावातील चित्र विदारक होते. गावात घाणीमुळे आणि आरोग्य सुविधेची सोय नसल्याने लोकांचे हाल व्हायचे. या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी ग्रामविकासाची चळवळ हाती घेतली. त्यातून काटेवाडी निर्मलग्राम, यशवंतग्राम, तंटामुक्तग्राम, विमाग्राम, देशातील पहिले सायबरग्राम, कृषीग्राम झाले. यापुढे ग्रामपंचायतीसह प्राथमिक शाळा, अंगणवाडीला आयएसओ मानांकनदेखील मिळाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी शाळा प्रवेश उत्सव दिन उपक्रम सुरू केला. गाव हागणदारीमुक्त करताना त्यांनी घेतलेली भूमिका पुढे संपूर्ण राज्यात गुड मॉर्निंग पथक या नावाने स्वीकारली गेली. समाजकारणासोबत राजकीय मैदानातही सुनेत्रा पवारांची भूमिका महत्त्वाची ठरली. गेल्या ४१ वर्षात शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यापैकी कुणाचीही निवडणूक असली तरी त्या प्रत्येक निवडणुकीत गाव, वाडी, वस्ती पालथी घातली. संपर्काच्या बळावर त्यांनी सर्व निवडणुकीत वेळोवेळी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.