Maharashtra Election 2019 : पूर्व विदर्भामध्ये बंडखोरांमुळे तिरंगी लढती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 06:05 AM2019-10-14T06:05:13+5:302019-10-14T06:05:40+5:30

मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला : भाजपचा विद्यमान आमदारांवर विश्वास तर ुकाँग्रेसने दिले नवे चेहरे

Maharashtra Election 2019 : Insurgents fight triangular in East Vidarbha! | Maharashtra Election 2019 : पूर्व विदर्भामध्ये बंडखोरांमुळे तिरंगी लढती!

Maharashtra Election 2019 : पूर्व विदर्भामध्ये बंडखोरांमुळे तिरंगी लढती!

Next

विदर्भात सहा जिल्ह्यातील ३२ मतदारसंघात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्यामुळे थेट लढती आता तिरंगी वळणावर गेल्या आहेत. तिकीट वाटपानंतर विदर्भात युती, आघाडीच्या सुमारे ५० जणांनी बंडखोरी केली होती; पण वरिष्ठांच्या प्रयत्नानंतर बहुतेकांनी माघार घेतली, मात्र अजूनही किमान १० बंडखोर रिंगणात कायम आहेत. उल्लेखनीय म्हणजे यातील मोजक्याच बंडखोरांवर संबंधित पक्षांनी कारवाई केली. अर्थात राहिलेल्यांना निवडणुकीनंतर पुन्हा पक्षात घेऊन पावन करून घेण्याचा पर्याय या पक्षांनी खुला ठेवला, हे सांगण्याची गरज नाही.


नागपुरात भाजपची जुनी तर काँग्रेसची नवी फौज मैदानात
नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा आहेत. यापैकी सद्यस्थितीत भाजपकडे ११ तर काँग्रेसकडे एक जागा आहे. आमदार आशिष देशमुख यांनी पूर्वीच भाजप सोडली. उरलेल्या १० पैकी ८ आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे, तर उर्वरित ४ जागांवर नवे चेहरे रिंगणात उतरविले. काँग्रेसने मात्र त्यांच्या वाट्याला आलेल्या १० पैकी ७ जागी नवे उमेदवार दिले आहेत. तर राष्ट्रवादीनेही हिंगणा येथील जागेवर उमेदवार बदलला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट न मिळाल्यामुळे सामाजिक समीकरणाचा फटका बसण्याची चिन्हे होती. मात्र, बावनकुळे यांच्यावर पूर्व विदर्भाच्या प्रचार प्रमुखाची जबाबदारी सोपवून भाजपने ‘डिझॉस्टर मॅनेजमेंट’ साधले आहे. युतीत एकही जागा न मिळाल्याने रामटेकमध्ये शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल व दक्षिण नागपुरात माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांनी बंडखोरी केली आहे. दक्षिणमध्ये भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनी बंड पुकारले. काँग्रेसच्या जवळपास सर्वच बंडखोरांनी वेळीच माघार घेतली आहे. बहुतांश मतदारसंघात एकतर्फी तर काही मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.


चंद्रपूर : विद्यमानांचा बोलबाला
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर मतदारसंघाचा अपवाद सोडला तर इतर पाच मतदारसंघ बंडखोरांपासून मुक्त आहेत. त्यामुळे येथे बहुतांश युती आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने यावेळी आपले चारही विद्यमान आमदार मैदानात उतरविले आहेत. राजुरा येथे भाजप-काँग्रेसच्या दोन धोटेत खरी लढत असली तरी, अपक्ष वामनराव चटप त्यात रंग आणू शकतात. बल्लारपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे विश्वास झाडे यांच्यातील लढतीत वंचितचे राजू झोडे तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊ शकतात. ब्रह्मपुरीत काँग्रेसचे तगडे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्याशी दोन हात करताना सेनेचे संदीप गड्डमवार यांना घाम फुटणार आहे. चिमूरमध्ये कीर्तीकुमार भांगडिया (भाजप) आणि सतीश वारजूकर (काँग्रेस) यांच्यात थेट लढत आहे. पण येथे वंचित बहुजन आघाडी किती मते घेईल, हे महत्त्वाचे आहे. गेल्यावेळी या मतदारसंघात वंचितला ५१ हजार मते मिळाली होती. वरोरा येथे सेनेचे संजय देवतळे यांना बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिमा धानोरकर यांचे आव्हान आहे. चंद्रपुरात मात्र तिकीट वाटपाच्या दोन दिवस आधी काँग्रेसमध्ये आलेले किशोर जोरगेवार तिकीट मिळाले नाही म्हणून बंडखोर म्हणून उभे ठाकले आहेत त्यामुळे नाना शामकुळे (भाजप) आणि महेश मेंढे यांच्यातील लढत तिरंगी वळणावर गेली आहे.


वर्धा : युतीत बंडखोरी
या जिल्ह्यातील निवडणुका जातीय समीकरणावरच जातात, असा आजवरचा अनुभव आहे. यावेळीही परिस्थिती वेगळी नाही. भाजप व काँग्रेसने यावेळी आपल्या विद्यमान आमदारांवरच विश्वास टाकला. आर्वीत भाजपचे दादाराव केचे आणि काँग्रेसचे अमर काळे यांच्यात थेट तुल्यबळ लढत आहे. तर वर्धेत भाजपचे पंकज भोयर यांच्यापुढे काँग्रेसचे शेखर शेंडे यांचे तगडे आव्हान आहे. देवळी आणि हिंगणघाट मतदारसंघात मात्र भाजप आणि सेनेच्या बंडखोरांनी लढत तिरंगी केली आहे. देवळीमध्ये सेनेचे समीर देशमुख यांना त्यांच्याच मित्रपक्षाचे बंडखोर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी आव्हान दिले आहे. याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे यांना होऊ शकतो. हिंगणघाट येथे भाजपच्या समीर कुणावारांना सेनेचे बंडखोर अशोक शिंदे यांच्याशी दोन हात करावे लागणार आहे. त्यांच्या शक्तिपरीक्षेत राष्टÑवादीचे राजू तिमांडे बाजी मारतील का? हे २४ तारखेलाच कळेल.
भंडाºयात तिरंगी सामने
भंडारा जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांत बंडखोरी झाल्यामुळे तीनही मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत अटळ आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली या तिन्ही जागा भाजपकडे होत्या; पण यावेळी पक्षाने तिघांचेही तिकीट कापून नवे उमेदवार दिले. तुमसरमध्ये चरण वाघमारे यांचे तिकीट शेवटच्या क्षणी कापून प्रदीप पडोळे यांना रिंगणात उतरविले. त्यामुळे नाराज वाघमारेंनी पडोळे यांच्याविरोधातच दंड थोपटले आहे. भंडाºयात भाजपच्या विरोधात शिवसेनेतूनच बंडखोरी झाली. सेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी अरविंद भालापुरे (भाजप) यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. साकोलीत पालकमंत्री परिणय फुके (भाजप) आणि नाना पटोले (काँग्रेस) आमनेसामने असल्यामुळे ही लढत हेवीवेट मानली जात आहे. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी केल्यामुळे नानांची डोकेदुखी वाढली असून, ही लढतही तिरंगीकडे झुकली आहे.
गोंदियात बंडखोरांचा बोलबाला
गोंदिया जिल्ह्यातील सर्व चारही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. येथे भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादी या तिन्ही प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागल्यामुळे, जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव सोडले तर सर्वच ठिकाणी तिरंगी लढती चुरशीच्या ठरणार आहेत. गोंदियात भाजपचे गोपालदास अग्रवाल यांना विनोद अग्रवालांचे मोठे आव्हान आहे. तर आमगावात काँग्रेसचे सहसराम कोरोटे यांना बंडखोर रामरतन राऊत डोकेदुखी ठरतील. तिरोड्यात राष्टÑवादीचे गुड्डू बोपचे त्यांच्या पक्षातील बंडखोर दिलीप बन्सोड यांच्यामुळे परेशान आहेत. अर्जुनी मोरगावमध्ये मात्र माजी मंत्री राजकुमार बडोले (भाजप) आणि मनोहर चंद्रिकापुरे (काँग्रेस) यांच्यात थेट लढत आहे.
गडचिरोली अजून शांत शांत
मतदान अवघ्या नऊ दिवसांवर येऊन ठेपले असताना प्रचाराच्या आघाडीवर गडचिरोली जिल्हा तापलेला नाही. ग्रामीण भागात थोडीफार हालचाल दिसत असली तरी, शहरी भागात निवडणुका असल्यासारखे वाटत नाही.
जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली आहे. अहेरीच्या रिंगणात उतरलेल्या तीन आत्रामांकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे. भाजपचे अम्बरिशराव आत्राम यांच्याविरोधात काँग्रेसने दीपक आत्राम यांना उमेदवारी दिली असताना, धर्मरावबाबा आत्राम यांनी अचानक राष्टÑवादीचे उमेदवार म्हणून उडी घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. खरे तर धर्मरावबाबांना भाजपची उमेदवारी हवी होती, पण शेवटपर्यंत तळ््यात की मळ््यातची स्थिती कायम राहिली. आता येथे काँगेस-राष्टÑवादी एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात की मैत्रीपूर्ण लढत देतात, हे पाहणे मनोरंजक ठरेल. वंचित व बसपाने अस्तित्व म्हणून जिल्ह्यात उमेदवार उभे केले आहेत, पण हे अस्तित्व शेवटी कागदावरच राहील.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या ३२ मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री परिणय फुके, विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजकुमार बडोले, नितीन राऊत, अनिल देशमुख, माजी खासदार नाना पटोले, भाजपचे प्रतोद सुधाकर देशमुख, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल या दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतींकडे लागले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Insurgents fight triangular in East Vidarbha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.