“कोण आहेत पार्थ पवार? राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे ठरू नये”: अंजली दमानिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 21:18 IST2026-02-24T21:16:47+5:302026-02-24T21:18:06+5:30
Anjali Damania News: महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाचा मान हा गुणवत्तेला मिळायला हवा, वारसाहक्काला नव्हे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

“कोण आहेत पार्थ पवार? राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे ठरू नये”: अंजली दमानिया
Anjali Damania News:अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा अजित पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या. उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सक्रीय होत अनेक बैठका घेतल्या. तसेच अजित पवार यांच्याकडे असलेल्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी स्वीकारली. यानंतर आता अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यातच अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत यावर भाष्य केले.
अजित पवारांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाची सूत्रे आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याची केवळ औपचारिकता असल्याचे बोलले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचेही चर्चा सुरू झाली. पण, ही चर्चा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळून लावली. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा देण्याचा विषयही त्याठिकाणी झाला नाही. कुठल्याही व्यक्तीला राज्याचा किंवा देशाचा मंत्री होत असताना सहा महिने त्या सभागृहाचा सदस्य होण्याचा वेळ असतो. अशा वेळी इतर सभागृहाचे सदस्यत्व त्याच्याकडे असेल, तर ते कायद्याने ठेवता येते, असे सुनील तटकरे यांनी म्हटले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत पार्थ पवार यांच्या राज्यसभेवर वर्णी लागण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
कोण आहेत पार्थ पवार? राज्यसभेवर पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे ठरू नये
कोण आहेत पार्थ पवार? महाराष्ट्रासाठी त्यांचे ठोस सामाजिक किंवा राजकीय योगदान नेमके काय आहे? जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी कोणती सातत्यपूर्ण भूमिका घेतली आहे? कोणते आंदोलन, कोणती धोरणात्मक पुढाकार, कोणते लोकहिताचे काम त्यांच्या नावावर आहे? राज्यसभेसारख्या गंभीर आणि प्रतिष्ठित सभागृहात पाठवण्यासाठी केवळ आडनाव पुरेसे ठरू नये. पात्रता, अनुभव, जनाधार आणि कार्याचा ठसा, यावरच निर्णय व्हायला हवा. महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाचा मान हा गुणवत्तेला मिळायला हवा, वारसाहक्काला नव्हे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या साथीने अजितदादांची जोरदार सुरुवात झाली होती. यंदाचा अर्थसंकल्प त्यांच्या कारकिर्दीतील बारावा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि अचानक अजितदादा आपल्याला सोडून गेले. पण यापूर्वीच अजितदादांच्या टीमने अर्थसंकल्पाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात नेली होती. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस सादर करतील. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका करण्यात येत होती; पण पुन्हा सत्तेत आल्यावर अजित पवारांनी योग्य आर्थिक नियोजन करून या योजनेसाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली नाही. ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवली. हे माझं पहिलंच अधिवेशन आहे आणि मला खात्री आहे की हे अधिवेशन अत्यंत चांगल्या प्रकारे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चालेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला होता.
कोण आहेत पार्थ पवार?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 24, 2026
महाराष्ट्रासाठी त्यांचे ठोस सामाजिक किंवा राजकीय योगदान नेमके काय आहे? जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी कोणती सातत्यपूर्ण भूमिका घेतली आहे? कोणते आंदोलन, कोणती धोरणात्मक पुढाकार, कोणते लोकहिताचे काम त्यांच्या नावावर आहे?
राज्यसभेसारख्या गंभीर आणि प्रतिष्ठित… pic.twitter.com/16hq89O6aC