"समोर अजितदादांचं पार्थिव होतं अन्...! पहिल्या दोन तासांतच..., एवढी घाई काय होती?" छगन भुजबळ यांनी कुणाला सुनावलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 21:13 IST2026-02-26T21:12:32+5:302026-02-26T21:13:46+5:30
यावेळी, बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत, या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्यांना थेटच सुनावले.

"समोर अजितदादांचं पार्थिव होतं अन्...! पहिल्या दोन तासांतच..., एवढी घाई काय होती?" छगन भुजबळ यांनी कुणाला सुनावलं?
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी, बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत, या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्यांना थेटच सुनावले.
"समोर दादांचं पार्थिव होतं अन्..." -
भुजबळ म्हणाले, "आजदेखील मन हे मानायला तयार नाही की, दादा आमच्यात नाहीत. दादा गेले आणि त्यांच्या मागे लाखो आपले कार्यकर्त्यांना मोठ्या दुःखद दुविधेत टाकून गेले. कोणतीही चर्चा नाही, काहीच नाही, बस असेच निघून गेले. आणि तुम्ही पाहिलं की, त्यानंतर लगेचच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. समोर दादांचं पार्थिव होतं आणि माध्यमांत औरच बातम्या सुरू होत्या. कुणी थांबायला तयार नव्हतं. मोठी दुःखाची गोष्ट आहे. आश्चर्य तर सर्वांनाच होतंय. पण आम्हाला मोठ्या दुःख्खाने म्हणावे लागतेय की, असे नसते झाले तर बरे झाले असते. सर्वजण जर सुनेत्रा ताईंच्या मागे उभे राहिले असते, संपूर्ण कुटुंब उभे राहिले असते, तर सर्वांच्या मनाला चांगले वाटले असते. मात्र, हे होऊ शकले नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी म्हटले आहे."
भुजबळ पुढे म्हणाले, "रस्त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमचेही जे नेते आहेत, त्यांनी आयुष्य राजकारणात घालवले आहे. जेव्हा हे लक्षात आले की काहीतरी वेगळेच सुरू झाले आहे. तेव्हा लगेच निर्णय घेण्यात आला की, लवकरात लवकर आपण आपला नेता निवडयला हवा. पक्षाची सूत्रं सांभाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीची आपल्याला आज नितांत आवश्यकता आहे."
"मग चर्चा सुरू झाली, आम्ही सुनेत्रा ताईंना समजावले की, अशी परिस्थिती येईल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण ती आली आहे. घर पुढे न्यायचे असेल तर कुणाला तरी नेतृत्व करावेच लागते. येथ आपले लाखो कार्यकर्त्ये आहे. त्यांनी कुणाकडे पाहायचे? काय आपण त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून देणार?" असे भुजबळ म्हणाले.
"पहिल्या दोन तासांत तुम्ही तर विलीनीकरणाची चर्चा सुरू केली" -
"दादांनी जे काम लोकांसाठी केले, लोक जमवले. हिंदू, मुस्लिम सर्व वर्गाचे लोक होते. त्यांना एक संदेश देणे आवश्यक होते की दादा राहिले नाहीत, तरीही आम्ही दादांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार. आमचा पक्ष अखंड राहील, तुटणार नाही. तोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा, काही होणार नाही. आणि लगेचच ताईंचा शपथविधी झाला. त्यावर चर्चा, एवढी घाई काय होती? एवढी घाई काय होती? अरे बाब, एवढी घाई काय होती, तर पहिल्या दोन तासांत तुम्ही तर विलीनीकरणाची (merger) चर्चा सुरू केली, तर मग एवढी घाई काय होती? तेव्हा तर घाई नव्हती...!"
"काय चुकले होते आमचे?" -
"आपण तर अनेक वेळा बघितले आहे, त्याच दिवशी, अंत्यविधी पूर्ण होण्याआधीच शपथ घेतली जाते, यात काय चुकीचे होते? तरी त्यावर कटाक्ष करण्यात आला. टिप्पणी करण्यात आली. काय चुकले होते आमचे? आम्ही तर इच्छित होतो की, आपण सर्वजण एक होऊन चालावे, पण ही दरी कोणी निर्माण केली? आम्ही नाही निर्माण केली. आता लोक म्हणतात की सुनेत्रा ताई कसं काय सांभाळतील? अरे बाबांनो, इंदिरा गांधींना जेव्हा बनवलं गेलं तेव्हाही हेच म्हटलं गेलं की 'गुंगी गुडिया' आहेत. पण त्यांनी जो इतिहास घडवला तो जगासमोर आहे. तर आमच्या सुत्रा ताईदेखील आज नवीन नाहीत. त्या बारामतीमध्ये दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होत्या, राज्यसभेत काम करत आहेत, त्यांना अनुभव आहे आणि जोपर्यंत सूत्रं हातात येत नाहीत, तोपर्यंत अनुभव कसा मिळणार? असा सवालही त्यांनी केला. याचवेळी आम्ही आहोत ना, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. असा विश्वासही भुजबळ यांनी यावेळी सुनेत्रा पवार यांना दिला.