लातूर जिल्ह्यात वर्षभरात ८४९ अपघातात ३८४ जणांचा मृत्यू; हेल्मेट, सिटबेलचा वापर केला असता, तर अनेकांचे वाचले असते प्राण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:30 IST2026-05-12T15:25:43+5:302026-05-12T15:30:02+5:30
केवळ दुचाकी चालवतानाच नाही, तर मागे बसणाऱ्या सहप्रवाशानेही हेल्मेट वापरणे तितकेच गरजेचे

लातूर जिल्ह्यात वर्षभरात ८४९ अपघातात ३८४ जणांचा मृत्यू; हेल्मेट, सिटबेलचा वापर केला असता, तर अनेकांचे वाचले असते प्राण !
लातूर : लातूर जिल्ह्यात २०२५ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांची आकडेवारी केवळ आकडा नसून, ती अनेक कुटुंबांच्या वेदनांची कहाणी आहे. जिल्हा पोलीस दलाने केलेल्या विश्लेषणातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जर वाहनचालकांनी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर केला असता, तर अपघातात मृत्यू झालेल्या ३८४ व्यक्तींपैकी बहुतेकांचे प्राण वाचवता आले असते.
जिल्ह्यात झालेल्या २९७ दुचाकी अपघातांमध्ये तब्बल २४० जणांनी आपला जीव गमावला. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, या मृतांपैकी बहुतांश जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. डोक्याला झालेली गंभीर दुखापत हेच या मृत्यूंचे मुख्य कारण ठरले आहे. केवळ दुचाकी चालवतानाच नाही, तर मागे बसणाऱ्या सहप्रवाशानेही हेल्मेट वापरणे तितकेच गरजेचे आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अपघातांचे दाहक वास्तव..!
एकूण अपघात : ८४९
झालेले मृत्यू : ३८४
दुचाकी अपघातातील मृत्यू : २४०
डोक्याला झालेली दुखापत मृत्यूंचे मुख्य कारण
चारचाकी वाहनातील सहप्रवाशांनी सीटबेल्ट न लावल्यामुळे आणि दुचाकीस्वारांनी हेल्मेट टाळल्यामुळे किरकोळ अपघातांचे रूपांतरही 'प्राणांतिक' अपघातात झाले आहे. डोक्याला झालेली गंभीर दुखापत हेच या मृत्यूंचे मुख्य कारण ठरले आहे
-अमोल तांबे, जिल्हा पोलिस अधीक्षक, लातूर.
सीटबेल्ट : सुरक्षित प्रवासाचा 'पासपोर्ट'
केवळ दुचाकीच नव्हे, तर चारचाकी वाहनांच्या बाबतीतही निष्काळजीपणा दिसून येत आहे. महामार्गावर किंवा अंतर्गत रस्त्यांवर वाहन चालवताना सीटबेल्ट न लावल्यामुळे अपघाताच्या वेळी व्यक्ती वाहनाबाहेर फेकली जाते किंवा स्टिअरिंगवर आदळते. एअरबॅग्ज असूनही, सीटबेल्ट नसेल, तर त्या अनेकदा उघडत नाहीत. यामुळेच गंभीर जखमी होण्याचे आणि जीव गमवावे लागण्याचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाचे आवाहन !
घराबाहेर दुचाकीवर निघताना आयएसआय मार्क असलेले हेल्मेट डोक्यावर असल्याची खात्री करा.
चारचाकीत बसताच सर्वात आधी सीटबेल्ट लावा.
लक्षात ठेवा, तुमची सुरक्षा हीच तुमच्या कुटुंबाची सुख-शांती आहे.