Kolhapur News: पाण्यासाठी वन्यजीवांमध्ये ‘मूक करार’; जंगलात दिसले अनोखे निसर्गदृश्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:10 IST2026-05-12T16:07:46+5:302026-05-12T16:10:09+5:30
रात्रीच्या अंधारात वन्यजीव ठरलेल्या वेळेत येतात आणि तहान भागवून शांतपणे निघून जातात.

Kolhapur News: पाण्यासाठी वन्यजीवांमध्ये ‘मूक करार’; जंगलात दिसले अनोखे निसर्गदृश्य!
आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : कोल्हापूरपासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलाशेजारील एका छोट्याशा पठारावर निसर्गाने जणू एक अद्भुत शांतता करार घडवून आणला आहे. उन्हाच्या झळांनी सुकत चाललेल्या त्या एकमेव पाणवठ्याकडे रात्रीच्या अंधारात वन्यजीव ठरलेल्या वेळेत येतात आणि तहान भागवून शांतपणे निघून जातात.
विशेष म्हणजे, येथे शिकारी आणि भक्ष्य यांच्यातही काही काळासाठी वैर विसरले जाते. रात्री भेकर पाणी पिऊन गेल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी बिबट्या त्याच ठिकाणी आला; पण त्याने हरणाचा माग काढला नाही, दबा धरला नाही. जणू त्या क्षणी तहान हीच सर्वांची समान गरज होती.
रानडुक्कर, भेकर, गवे, साळींदर आणि बिबट्यासारखे हिंस्त्र प्राणीही त्या पाणवठ्यावर एकामागून एक येतात. आसपासच्या तीन ते चार डोंगरांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने हा छोटासा साठाच त्यांच्या जगण्याचा आधार ठरला आहे.
तीव्र पाणीटंचाईच्या काळात अनेक प्राणी संघर्ष टाळून जगण्यासाठी पाण्याला प्राधान्य देतात. मात्र हे दृश्य पाहताना माणसालाही एक मोठा संदेश मिळतो. निसर्ग संकटात असताना वैर, हिंसा आणि स्पर्धेपेक्षा सहअस्तित्व अधिक महत्त्वाचे असते. जंगलातील त्या शांत पाणवठ्यावर रोज रात्री घडणारा हा ‘मूक तह’ निसर्गाच्या संवेदनशीलतेची आणि जगण्याच्या सामूहिक संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी सांगून जातो.
तृणभक्षक प्राणी पाणवठ्याची पूर्ण शहानिशा केल्यावरच पाणी पितात. मात्र, जंगलातील पाणवठे व त्या परिसरातील जर तो एकमेव पाणवठा असेल तर क्वचित अशा घटना घडू शकतात.- देवेंद्र भोसले, मानद वन्यजीवरक्षक, कोल्हापूर