"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:57 IST2026-05-12T17:56:58+5:302026-05-12T17:57:48+5:30
एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण विशाखापट्टणम परिसर हादरून गेला आहे.

फोटो - tv9hindi
एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण विशाखापट्टणम परिसर हादरून गेला आहे. श्रीकाकुलम येथील रहिवासी असलेल्या तेजश्रीच्या लग्नाला केवळ दोन महिने झाले होते, मात्र हुंड्याच्या हव्यासापोटी तिच्या पतीने तिचं आयुष्य हिरावून घेतलं. पती याला आत्महत्या म्हणत असला, तरी पोलीस तपास आणि शरीरावरील जखमांच्या खुणा ही एक सुनियोजित हत्या असल्याचे दर्शवत आहेत.
तेजश्रीच्या पालकांनी आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी श्रीकाकुलमच्या अरगोलू येथील दप्पा सोमेश्वर राव याची जावई म्हणून निवड केली होती. लग्नापूर्वी सोमेश्वरने आपण विशाखापट्टणम डॉकयार्डमध्ये कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. तसेच रामा टॉकीज परिसरात आपलं एक हॉस्टेल असून त्यातून महिन्याला २ लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचा खोटा दावाही त्याने केला होता.
"मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलंय"
मुलीला श्रीमंत आणि सुरक्षित घर मिळत आहे या आशेने पालकांनी कर्ज काढून ६ मार्च रोजी थाटामाटात लग्न लावून दिलं. हुंडा म्हणून १८ लाख रुपये रोख, १९ तोळं सोनं आणि इतर वस्तू असा एकूण २८ लाखांहून अधिक खर्च करण्यात आला. पण हे सर्व केवळ एक जाळे होते. लग्नानंतर सोमेश्वर जेव्हा तेजश्रीला विशाखापट्टणमच्या रेसापुवनिपलेम येथील घरी घेऊन गेला, तेव्हापासूनच त्याचं खरं रूप समोर आलं. पोलीस तपासात उघड झालं आहे की, सोमेश्वरने तेजश्रीला स्पष्टपणे सांगितलं होतं की, "सौंदर्यासाठी नाही, तर मी केवळ पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं आहे."
हुंडा आणण्यासाठी त्रास
विशाखापट्टणममध्ये आल्यापासूनच तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू झाले. आरोपी तिला आणखी हुंडा आणण्यासाठी त्रास देऊ लागला. इतकेच नाही तर सोमेश्वरचे इतर मुलींशीही संबंध असल्याचे पोलिसांना समजले आहे, ज्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. ७ तारखेला जेव्हा तेजश्रीची आई शारदा यांनी मुलीची विचारपूस करण्यासाठी फोन केला, तेव्हा अनेकदा रिंग जाऊनही फोन उचलला गेला नाही. शेवटी जावई सोमेश्वरने फोन उचलला आणि तेजश्रीने गळफास घेतल्याचं सांगितलं. हे ऐकताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.
कुटुंबाने केला आरोप
जेव्हा आई-वडील विशाखापट्टणम येथे पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांची मुलगी पलंगावर मृतावस्थेत आढळली. तेजश्रीच्या शरीरावर अनेक खुणा होत्या आणि सोमेश्वरने आधी तिला बेदम मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली, जेणेकरून या हत्येला आत्महत्येचं स्वरूप देता येईल, असा थेट आरोप कुटुंबाने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.