भारतातून परतताच UAE च्या राष्ट्रपतींचा पाकिस्तानला दे धक्का! शहबाज शरीफ यांची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:13 IST2026-01-24T18:12:06+5:302026-01-24T18:13:45+5:30
पाकिस्तान आणि युएईचे पूर्वीपासूनच विशेषतः विमान वाहतूक क्षेत्रात मजबूत संबंध आहेत. १९८० च्या दशकात एमिरेट्स एअरलाइन्सच्या स्थापनेत पाकिस्तानने मोठी भूमिका बजावली

भारतातून परतताच UAE च्या राष्ट्रपतींचा पाकिस्तानला दे धक्का! शहबाज शरीफ यांची झोप उडाली
इस्लामाबाद - UAE चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अचानक ३ तासांसाठी भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दौऱ्याने दक्षिण आशियातील चित्र बदललं आहे. भारतातून परतल्यानंतर शेख मोहम्मद जायद यांनी मैत्रीचा हवाला देत ९०० भारतीयांची जेलमधून सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पाकिस्तानलाही अप्रत्यक्षपणे यूएईने मोठा झटका दिला आहे.
पाकिस्तानच्या इस्लामाबाद विमानतळाचे संचालन करण्यासाठी युएईने केलेला करार आता रद्द केला आहे. पाकिस्तानी वृत्तसंस्था एक्सप्रेस ट्रिब्यूनने याची पुष्टी केली आहे. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, युएईने या प्रक्रियेत सहभाग घेण्यास नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांची झोप उडणार आहे. पाकिस्तानच्या आर्थिक अडचणीच्या काळात ऑगस्ट २०२५ मध्ये इस्लामाबाद विमानतळ ताब्यात घेण्यास युएईने सहमती दर्शविली होती. आता, युएईने केवळ या करारातून माघार घेतली नाही तर स्थानिक भागीदारही निश्चित केलेला नाही. इस्लामाबाद विमानतळ करार तुटण्यामागे कोणतेही राजकीय कारण रिपोर्टमध्ये थेट दिले नाही. परंतु हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा युएई आणि सौदी अरेबियामधील तणाव संपूर्ण दक्षिण आशियामध्ये उमटू लागले आहेत. पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला आहे आणि त्यात तुर्कीचा समावेश करून "इस्लामिक नाटो" तयार करू इच्छित आहे ज्यामुळे युएई नाराज असल्याचं बोलले जाते.
सौदीशी जवळीक बनली पाकिस्तानची अडचण?
इतकेच नाही तर पाकिस्तानशी करार मोडल्याची बातमी भारत आणि यूएई यांच्यातील संबंध मजबूत होत असताना पुढे आली आहे. १९ जानेवारीला शेख मोहम्मद बिन जायद अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहचले होते. त्यांचा हा दौरा अवघ्या ३ तासांचा होता परंतु त्याचे भविष्यात खूप परिणाम होतील असं मानले जात होते. पाकिस्तानचे दोन्ही आखाती देशांशी दीर्घकालीन आणि आर्थिक संबंध आहेत, परंतु त्यांचा कल नेहमीच सौदी अरेबियाकडे जास्त राहिला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली, ज्यात आता तुर्कीही सहभागी झाल्याचे सांगितले जाते.
पाकिस्ताननं गमावला विश्वास
पाकिस्तान आणि युएईचे पूर्वीपासूनच विशेषतः विमान वाहतूक क्षेत्रात मजबूत संबंध आहेत. १९८० च्या दशकात एमिरेट्स एअरलाइन्सच्या स्थापनेत पाकिस्तानने मोठी भूमिका बजावली. सुरुवातीला पाकिस्तानने तांत्रिक सहाय्यापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व काही पुरवले. एमिरेट्सची पहिली उड्डाण दुबई ते कराची होती. मात्र कालांतराने पाकिस्तानची स्वतःची एअरलाइन आणि तिची संपूर्ण विमान वाहतूक व्यवस्था कमकुवत झाली आहे. आज वारंवार अपघात होतात, पायलट परवाने सदोष आहेत आणि तंत्रज्ञान जुने झाले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही गुंतवणूकदारासाठी प्रणाली सुधारणे कठीण आहे. युएईला कठीण ठिकाणी काम करण्याचा, अफगाणिस्तानातील अनेक विमानतळ चालवण्याचा अनुभव आहे असे असूनही पाकिस्तानमधून त्यांनी माघार घेतल्याने तो विश्वास आता पूर्वीसारखा राहिलेला नाही हे स्पष्टपणे दिसून येते.