भारताशी सुरु असलेला वाद तुमचा तुम्हीच मिटवा...; रशियाने पाकिस्तानला दिला स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 08:08 IST2026-02-03T08:04:01+5:302026-02-03T08:08:32+5:30
Russia on India vs Pakistan Conflict: रशियाकडून भारत-पाकिस्तान वादावर अतिशय रोखठोक मत व्यक्त करण्यात आले आहे

भारताशी सुरु असलेला वाद तुमचा तुम्हीच मिटवा...; रशियाने पाकिस्तानला दिला स्पष्ट इशारा
Russia on India vs Pakistan Conflict: भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम हल्ल्यापासून तणाव वाढला आहे. या तणावानंतर भारताचे इतर विकसित देशांशी संबंध सुधारताना दिसत आहेत. सोमवारीच अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफमध्ये कपात केली. रशियाशीही भारताचे चांगले संबंध आहेत. तशातच आता दहशतवाद्यांचे आश्रयस्थान अशी ओळख असलेल्या पाकिस्तानलारशियाने सज्जड दम भरला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियाने स्पष्ट केले आहे की ते मध्यस्थ म्हणून काम करणार नाहीत. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की दोन्ही देशांनी हा वाद द्विपक्षीय पद्धतीने आपसाात चर्चा करून सोडवावा आणि जर एखाद्या देशाने विशेष विनंती केली तरच रशिया यात मदत करेल.
पाकिस्तानला स्पष्ट संदेश
एकीकडे दहशतवाद आणि दुसरीकडे चर्चा हा प्रकार एकाच वेळी चालणार नाही असे भारताने पाकिस्तानला खडसावले आहे. तेव्हापासून पाकिस्तान हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थाच्या शोधात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा मध्यस्थीचा दावा केला आहे. पण भारताने हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. दुसरीकडे आता रशियाने मध्यस्थ म्हणून सहभाग नोंदवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रशियाच्या या विधानाकडे भारतासाठी राजकीय प्रोत्साहन म्हणून पाहिले जात आहे. तसेच पाकिस्तानला इतर देशांची मदत घेण्याऐवजी संवादाद्वारे तणाव सोडवण्याचा एक मजबूत संदेश दिला जात आहे.
मध्यस्थीच्या भूमिकेबद्दल रशियाचे मत काय?
पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी रशिया मध्यस्थ म्हणून भूमिका बजावेल का? या प्रश्नाच्या उत्तरात, रशियन परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे, "रशिया मध्यस्थ म्हणून काम करत नाही." त्यात पुढे म्हटले आहे की, "जर यापैकी कोणत्याही देशांनी विनंती केली, तर आम्ही त्यांच्यातील कोणतेही मतभेद सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास नेहमीच तयार आहोत."