अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना केलं लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 08:11 IST2026-02-22T08:10:45+5:302026-02-22T08:11:28+5:30
पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला आहे.

अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर पाकिस्तानचा एअर स्ट्राईक; दहशतवादी तळांना केलं लक्ष्य, १९ जणांचा मृत्यू
पाकिस्ताननेअफगाणिस्तान सीमेजवळ दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानमधील अलीकडील आत्मघाती हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केला. या एअर स्ट्राईकमध्ये १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी रविवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती दिली की, सैन्याने 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या सात तळांवर गुप्त माहितीच्या आधारे निवडक ऑपरेशन्स केली आहेत. सीमावर्ती भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित एका गटावरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मात्र हे हल्ले नेमके कोणत्या ठिकाणी करण्यात आले हे पाकिस्तानने स्पष्ट केलेलं नाही. सोशल मीडियावरील रिपोर्ट्सनुसार, हे हल्ले अफगाणिस्तानच्या हद्दीत झाले आहेत. या हल्ल्यानंतर अफगाण सरकारचे विधानही समोर आलं आहे. अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे की, पाकिस्तानने एका मदरसावर हल्ला केला असून या हल्ल्यात १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानने या हल्ल्याचा बदला घेणार असल्याचं म्हटलं आहे.
Pakistan strikes religious seminary in Afghanistan's Paktika
— ANI Digital (@ani_digital) February 21, 2026
Read @ANI Story l https://t.co/xQnIIVAz7g#Pakistan#Afghanistan#Airstrikespic.twitter.com/9GiHOKyCId
'टोलो न्यूज'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात एका मदरसावर हल्ला केला. याशिवाय पाकिस्तानी लढाऊ विमानांनी नंगरहार प्रांतातील खोगयानी जिल्ह्यातही एअर स्ट्राईक केला. पक्तिकाच्या बरमल आणि अर्गुनसह नंगरहारमधील खोगयानी, बहसोद आणि गनी खेल जिल्ह्यांतही हल्ले करण्यात आले.
खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ११ जण आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच बन्नू जिल्ह्यात झालेल्या दुसऱ्या एका आत्मघाती हल्ल्यात लेफ्टनंट कर्नलसह दोन जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांनंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. या हल्ल्यांमागे अफगाणिस्तानात बसलेल्या टीटीपी नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ही संघटना अफगाण तालिबानपेक्षा वेगळी असली, तरी ती त्यांची जवळची मानली जाते. टीटीपी पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर करतं, असा आरोप पाकिस्तान दीर्घकाळापासून करत आहे. मात्र काबूल आणि टीटीपीने नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.