लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:14 IST2026-04-18T17:11:51+5:302026-04-18T17:14:51+5:30
जेव्हा राकेशचे कुटुंब आर्थिक अडचणीत होते, तेव्हा नातेवाईकांनी मुलांना सरकारी शाळेत दाखल करून कामाला जाण्याचा सल्ला दिला. पण त्याची आई सत्यम्मा यांनी हार मानली नाही.

लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
यशाचा मार्ग एखाद्या महालातून निघत नाही तर त्यासाठी कष्ट आणि संघर्ष पाठीशी असावा लागतो. तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील राकेश चिटकेला याची कहाणीही अशीच आहे. ज्या वयात लहान मुले खेळतात त्या वयात सकाळी ४ वाजता उठून राकेशने आईसोबत साफसफाईचं काम केले होते. आज तोच राकेश चिटकेला देशाच्या शिक्षण मंत्रालयात भारताच्या शिक्षण धोरणात महत्त्वाचे योगदान देत आहे.
राकेशचा प्रवास केवळ त्याचे यश नाही तर संसाधनांच्या अभावामुळे आपली स्वप्ने दडपून टाकणाऱ्या लाखो तरुणांसाठी आशेचा किरण आहे. शिक्षण मंत्रालयात एक प्रतिष्ठित पद मिळवून राकेश चिटकेलाने त्याच्या आईने त्याला शिक्षण देण्यासाठी गाळलेल्या अश्रू आणि घामाचे ऋण फेडले आहे. राकेशच्या यशामागे त्याची आई सत्यम्मा यांचा अढळ विश्वास आहे, ज्यांनी आर्थिक अडचणी असूनही आपल्या मुलांच्या शिक्षणाशी कधीही तडजोड केली नाही.
लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलं
२००० सालच्या सुरुवातीला जेव्हा राकेशच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यावेळी राकेश फक्त ११ वर्षांचा होता. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आर्थिक परिस्थिती पार कोलमडली. घरखर्च भागवण्यासाठी त्याच्या आईने सेंट अँथनी हायस्कूलमध्ये आया म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ज्यातून तिला महिन्याला केवळ ६,००० रुपये मिळत होते. आईला हातभार लागावा आणि अतिरिक्त उत्पन्न मिळावं यासाठी राकेश पहाटे ४ वाजता उठून आईसोबत जवळच्या अग्निशमन केंद्राची साफसफाई करायला जायचा. 'द बेटर इंडिया' ही यशोगाथा समोर आणली आहे.
जेव्हा राकेशचे कुटुंब आर्थिक अडचणीत होते, तेव्हा नातेवाईकांनी मुलांना सरकारी शाळेत दाखल करून कामाला जाण्याचा सल्ला दिला. पण त्याची आई सत्यम्मा यांनी हार मानली नाही. मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी त्यांनी कर्ज काढले. आपल्या गरजा कमी केल्या आणि लग्नसमारंभात साफसफाई करण्यासारखी अतिरिक्त कामे स्वीकारली. राकेशनेही आपल्या आईचा संघर्ष वाया जाऊ दिला नाही. त्याने दहावीत ९.२ जीपीए मिळवला आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण सुरू ठेवले.
केरळच्या केंद्रीय विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर राकेश याच्या मेहनतीचं फळ मिळालं. त्याने केवळ परीक्षेत अव्वल स्थानच मिळवले नाही, तर सुवर्णपदक देखील पटकावले. त्यानंतर त्याने आयआयटी जोधपूर येथे प्रशासकीय सहाय्यक म्हणून काम केले. या अनुभवांनी राकेशला असा आत्मविश्वास दिला, ज्यामुळे तो देशातील सर्वात प्रतिष्ठित पदांपर्यंत पोहोचला.
शिक्षण मंत्रालयातील एक महत्त्वाची भूमिका
डिसेंबर २०२४ मध्ये राकेश शिक्षण मंत्रालयात रुजू झाला. आज तो अशा पॉलिसी आणि चर्चांचा महत्त्वाचा घटक आहे ज्यातून देशाच्या शिक्षण व्यवस्थेची दिशा ठरवली जाते. २०२६ मध्ये त्याची हार्वर्ड कॉलेज प्रोजेक्ट फॉर एशियन अँड इंटरनॅशनल रिलेशन्स (HPAIR) साठी प्रतिनिधी म्हणून निवड झाली. जो एक जागतिक सन्मान आहे. राकेश आता यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून समाजाची सेवा करण्याचे स्वप्न पाहत आहेत.