भाव पडले त्यात अवकाळीचा फटका; हिंगोलीत शेतकऱ्यांची दाणादाण, हजारो क्विंटल हळद भिजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 17:43 IST2026-05-05T17:42:50+5:302026-05-05T17:43:37+5:30
हिंगोलीत ३०० वाहनांमधील हळद वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची पावसात कसरत.

भाव पडले त्यात अवकाळीचा फटका; हिंगोलीत शेतकऱ्यांची दाणादाण, हजारो क्विंटल हळद भिजली
हिंगोली: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवडाभरानंतर ४ मे पासून हळदीचे व्यवहार पूर्ववत सुरू झाले होते. मात्र, मंगळवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बाजार समितीच्या मार्केट यार्डात एकच धांदल उडवून दिली. लिलावासाठी ओट्यावर ठेवलेली आणि वाहनांमध्ये असलेली हळद पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वाऱ्याचा वेग आणि पावसाचा मार
बाजार आवारात सध्या सुमारे ३०० वाहनांमधून १० ते १२ हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आली आहे. पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांनी मेनकापडाचा (प्लास्टिक ताडपत्री) आधार घेतला, परंतु वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने पावसाचे पाणी ओट्यावरील हळदीपर्यंत पोहोचले. भिजलेल्या हळदीला आता कमी भाव मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खर्चाचा वाढता बोजा
शेतकऱ्यांना आधीच क्विंटलमागे ५०० रुपयांची घसरण सोसावी लागत आहे. त्यातच गेल्या २-४ दिवसांपासून मार्केटमध्ये मुक्काम असल्याने वाहनांचे भाडे वाढत आहे. मंगळवारच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना ऐनवेळी बाजारपेठ गाठून मेनकापड खरेदी करावे लागले, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड पडला आहे.