भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती?

By किरण अग्रवाल | Published: September 5, 2019 09:09 AM2019-09-05T09:09:47+5:302019-09-05T09:12:34+5:30

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध होण्यामागे दोन प्रमुख कारणं आहेत.

Why there is delay for Chhagan Bhujbal's entry in Shiv Sena? | भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती?

भुजबळांचा शिवसेना प्रवेश का रखडलाय?; आदित्यची काळजी की युतीची भीती?

Next
ठळक मुद्देसत्तेत असो, अगर नसो; महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या मोजक्या नेत्यांचा दबदबा टिकून आहे, त्यात छगन भुजबळ यांचे नाव अग्रक्रमाने घेता येणारे आहे.भुजबळ राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत स्वगृही परतताहेत अशी चर्चा होऊ लागल्याने राजकारण ढवळून निघणे स्वाभाविक आहे.

>> किरण अग्रवाल

राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे पेव फुटलेले असताना राष्ट्रवादीतील मातब्बर नेते छगन भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश मात्र 'तारीख पे तारीख' पडून रखडल्याने त्याबाबतची संभ्रमावस्था व उत्सुकताही टिकून आहे. भुजबळांचे राष्ट्रवादीतून बाहेर पडणे व शिवसेनेतील येण्याकडे इतरांसारखे सहज म्हणून पाहता येणारे नाही, तर ते अनेकार्थाने परिणामकारी ठरणारे असल्यामुळेच यासंदर्भातली स्पष्टता होऊ शकलेली नाही, असाच अर्थ यातून काढता यावा.

सत्तेत असो, अगर नसो; महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या मोजक्या नेत्यांचा दबदबा टिकून आहे, त्यात छगन भुजबळ यांचे नाव अग्रक्रमाने घेता येणारे आहे. सामान्य शिवसैनिक ते उपमुख्यमंत्री, व्हाया मुंबईचे महापौर व आणखी बरेच काही... अशी दमदार राजकीय वाटचाल राहिलेले भुजबळ आपल्या उपजत आक्रमक स्वभावशैलीमुळे 'फायर ब्रॅण्ड' नेते म्हणून तर ओळखले जातातच; परंतु समता परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी केलेल्या ओबीसींच्या संघटनेमुळे या वर्गाचे पाठीशी असलेले पाठबळ पाहता, त्यांच्या भूमिकांकडे कुणाला दुर्लक्षही करता येत नाही. भुजबळ आक्रमक आहेत तसे मिश्कीलही आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'भाईयो और बहनो'ची त्यांनी केलेली नक्कल आठवून हसू आवरता न येणारे आजही भेटतात. शिवसेना व शिवसेनाप्रमुखांच्या प्रभाव काळात त्या पक्षाला 'जय महाराष्ट्र' करण्याचे धाडस दाखवणारे भुजबळ त्यानंतरच्या काळात शरद पवार यांच्यासोबत राहिले; पण त्यांच्या स्वभावशैलीत काही फरक पडला नाही. महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी चौकशांना व कारावासालाही सामोरे जावे लागले; पण त्यांचा राजकीय दरारा टिकून आहे. म्हणूनच, नवीन राजकीय समीकरणांत ते राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत स्वगृही परतताहेत अशी चर्चा होऊ लागल्याने राजकारण ढवळून निघणे स्वाभाविक ठरून गेले आहे.

अर्थात, भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा असल्या तरी त्याचा स्पष्ट इन्कार न करता, 'किमान मला विचारून बातम्या द्या', असे संदिग्ध मतप्रदर्शन त्यांनी केले आहे. त्यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी मात्र या चर्चांना अफवा ठरवले आहे. भुजबळ यांच्या 'मी आहे तिथे खुश आहे', अशा एका विधानाचा दाखला देत शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या चर्चांना फेटाळले आहे. परंतु रोज नवनवीन तारखा व प्रवेश रखडण्याच्या कारणांची चर्चा झडत असल्याने संभ्रमावस्था वाढून गेली आहे. भरीस भर म्हणजे, भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातील विंचूर येथे एका कार्यक्रमात स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शिवसेनेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले व भगवी शाल पांघरत शिवसेनाप्रमुखांचा जयजयकारही केला. शिवाय तत्पूर्वी त्यांच्या प्रवेशास विरोध दर्शवायला 'मातोश्री'वर गेलेल्यांची उद्धव ठाकरे यांनी भुजबळांचा राज्यात अन्यत्रही काही उपयोग होणार नाही का, अशी गुगली टाकत परत पाठवणी केली होती, त्यावरून यासंबंधाच्या चर्चा अगदीच निराधार, निरर्थकही म्हणता येऊ नये. मात्र एकीकडे, राज्यातील अन्य नेत्यांचे प्रवेश धडाक्यात होत असताना भुजबळांचा प्रवेश चर्चेच्या पातळीवर रखडला आहे. इतर नेत्यांचे प्रवेश वा पक्षांतरे ही वैयक्तिक त्यांच्या मतदारसंघापुरती परिणामकारक ठरणारी असू शकतात; पण भुजबळांचा निर्णय हा त्या पक्षावरही व संपूर्ण राज्यात दखलपात्र ठरू शकणारा असल्यानेच त्याबाबतच्या निर्णयात विलंब होत असावा, हेच यातून लक्षात घेता यावे.

महत्त्वाचे म्हणजे, भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध होण्यामागे जी प्रमुख दोन कारणे दिली जातात त्यातील एक असे की, त्यांनी शिवसेनाप्रमुखांवर खटला दाखल करून त्यांना न्यायालयात उभे राहण्यास भाग पाडल्याचा राग शिवसैनिकांमध्ये आहे, तसे घडलेही आहे. पण येथे हेदेखील खरे की, अंतिमत: बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अस्वास्थ्य लक्षात घेऊन तब्बल ११ वर्षांनंतर भुजबळ यांनीच सदर खटला मागे घेतला. नंतरच्या काळात त्यांचे व पुत्र पंकजचे ‘मातोश्री’वर जाणेही झाले. तेव्हा, तो राग अद्याप टिकून असल्याचे म्हणता येऊ नये. शिवाय, राजकारणात अशी कारणे व रुसवे फार काळ तग धरून नसतातच. त्यामुळे तेवढ्या कारणासाठी भुजबळांचा प्रवेश रखडेल असे मानता येऊ नये. दुसरे कारण म्हणजे, भुजबळांसारखा नेता परत शिवसेनेत आल्यास उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यानंतरच्या फळीत त्यांचे स्थान महत्त्वाचे असेल, त्यामुळे आपसूकच विद्यमान काहींचे क्रमांक खाली घसरतील. यामुळेही त्यांना स्वगृही घेण्यात आडकाठी आणली जात असावी व तेच कारण अधिक पटणारे आहे. भुजबळांचा प्रवेश रखडला असावा तो त्यामुळेच.

छगन भुजबळांनी का सोडली होती शिवसेना?; झाला होता भन्नाट ड्रामा!

भुजबळांना शिवसेनेत घेतले तर त्यांच्या स्वत:साठी व पुत्रासाठीही जागा सोडावी लागेल, इतका किरकोळ प्रश्न शिवसेनेच्या कार्यकारी प्रमुखांपुढे असू शकत नाही; कारण त्यापलीकडे जाऊन पाहता भुजबळांमुळे राज्यात शिवसेनेच्या मतांमध्ये भरच पडण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. याहीखेरीज भाजपसोबतची शिवसेनेची 'युती' टिकून राहीलच याची छातीठोकपणे ग्वाही आज कुणीही देत नाही. समजा ऐनवेळी भाजपने शिवसेनेचे बोट सोडून दिलेच तर, त्यावेळी उद्भवू शकणाऱ्या स्थितीत भुजबळांसारखा नेता शिवसेनेत असेल तर ते त्या पक्षासाठी लाभदायीच राहणारे आहे. पण अशा, म्हणजे 'युती' फिसकटण्याच्या स्थितीत भुजबळांना तरी शिवसेनेत राहण्यात काय स्वारस्य असेल, हा खरा प्रश्न ठरावा. कारण, थेट भाजपत नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून सत्तेत राहण्यासाठीच जर ते पक्षांतर करू पाहात असतील आणि चौकशांच्या अडथळ्यातून बचावण्याचा त्यामागे हेतू असेल तर त्यासाठी युती असावी लागेल. आज तेही सुस्पष्ट नाही. भुजबळांचा निर्णय लांबण्यामागे तेही एक कारण असू शकते. एकूणच सारे चित्र संभ्रमावस्था कायम राखणारेच आहे.

Web Title: Why there is delay for Chhagan Bhujbal's entry in Shiv Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.