...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का?

By संदीप प्रधान | Published: August 29, 2019 02:53 PM2019-08-29T14:53:02+5:302019-08-29T14:56:25+5:30

शिवसेनेला निम्म्यानिम्म्या म्हणजे १४४ जागा देण्याचे आश्वासन देऊन बसलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली.

Maharashtra Assembly Election: Shiv Sena has no other option but to compromise with BJP | ...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का?

...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का?

Next
ठळक मुद्देयुती करून लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर भाजपची 'अब की बार ३०० पार' ही घोषणा प्रत्यक्षात आली.केवळ एका 'अवजड' मंत्रीपदावर शिवसेनेची बोळवण करण्यात आली. मनात आले तर युती तोडायची, मनात आले तर गळ्यात गळे घालायचे, हे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना मान्य नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी वरळीतील एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत ठाकरे-शहा यांनी पत्रकारांचे प्रश्न टाळले. ठाकरे आणि शिवसेनेचे खा. संजय राऊत यांचा चेहरा पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गालातल्या गालात हसत होते. युती करून लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर भाजपची 'अब की बार ३०० पार' ही घोषणा प्रत्यक्षात आली. युती केली नसती, तरी ही घोषणा प्रत्यक्षात आली असती किंवा कसे, ते ठाऊक नाही. पण, भाजपला दुसऱ्यांदा संपूर्णपणे स्वबळावर सत्ता मिळाल्यामुळे शिवसेनेसारखा अडीच दशकांचा मित्रपक्ष अक्षरश: अडगळीत पडला. केवळ एका 'अवजड' मंत्रीपदावर शिवसेनेची बोळवण करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत पुन्हा जागावाटपावरून युतीत तणातणी होणार, याचे संकेत त्याचवेळी मिळाले होते.

लोकसभा निकालानंतर भाजपच्या मंडळींचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, भाजप जर स्वबळावर लढली, तर पक्षाला १६७ ते १७० जागा मिळतील. साहजिकच, लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला निम्म्यानिम्म्या म्हणजे १४४ जागा देण्याचे आश्वासन देऊन बसलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. जर युती झाली तर आपला मतदारसंघ भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, या पेचात सापडलेले काही आजी-माजी आमदार सध्या कुंपणावर बसून आहेत. ज्यांना आपल्याकरिता जागा मोकळी असल्याची खात्री आहे, तेच भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.

मागील वेळी जागावाटपावरून युती तुटली आणि स्वबळावर लढल्यानंतर भाजपने १२३ जागांपर्यंत मजल मारली, तर शिवसेना ६३ जागांपर्यंत गेली. आतापर्यंत शिवसेनेच्या सहकार्याने वाटचाल करणाऱ्या भाजपचे हे संख्याबळ आजपर्यंतचे सर्वाधिक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात होणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मिळालेले यश हे केवळ त्यांचे होते. राज्यात १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा सत्ता प्राप्त केली, तेव्हा शिवसेनेला ७४ जागांवर विजय मिळाला होता. उद्धव यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा, नारायण राणे व राज ठाकरे यासारख्या आक्रमक व करिष्मा असलेल्या नेत्यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी या पश्चात उद्धव यांनी मिळवलेले हे यश निश्चित मोठे होते. त्यामुळे याचा परिणाम असा झाला की, भाजप आणि शिवसेनेला आपापले यश हे अहंकारी बनवून गेले. त्याचा परिणाम मागील सरकारमध्ये साडेचार वर्षे शिवसेना विरोधी पक्षाच्या आविर्भावात भाजपवर तोंडसुख घेत राहिली.

त्यामुळे आता विधानसभा निवडणूक लढवताना भाजपच्या जास्तीतजास्त जागा विजयी होतील व शिवसेनेचे संख्याबळ ६३ पेक्षा कमी होईल, अशी व्यूहरचना करणे, ही भाजपची गरज आहे. स्वबळावर लढून जर १६७ जागांवर विजय मिळत असेल, तर तो पर्याय स्वीकारण्याची भाजपची ना नाही. मात्र, मनात आले तर युती तोडायची, मनात आले तर गळ्यात गळे घालायचे, हे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना मान्य नाही. यातून हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा मतदार नाराज होईल, असे पक्षातील काहींना वाटते. मागील वेळी युती तुटली, तो अपघात म्हणून मतदार स्वीकारतील, पण लोकसभेला गळ्यात गळे घालायचे व विधानसभेला पुन्हा परस्परांवर टीका करायची, हे काही भाजप नेत्यांना मान्य नाही. मात्र, तरीही स्वबळाचा हेकाच अधिक लाभदायक असल्याचे वाटले तर भाजप तो पर्याय स्वीकारेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याभोवती सध्या ईडीने फास आवळला असून राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचे गर्भगळीत मनसैनिक सक्रिय झाले आहेत. स्वबळावर लढताना शिवसेनेच्या काही जागांवर मनसेला उमेदवार देण्यास भाग पाडून शिवसेनेचे संख्याबळ रोखण्याची खेळी खेळली जाऊ शकते. समजा, युती झाली तरीही मनसेची शेंडी भाजपच्या हातात आहे. शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागांवर उमेदवार देऊन मनसे किमान १० ते १५ जागांवर अपशकुन करू शकली, तर शिवसेना काबूत राहते.

सध्या शिवसेनेत संक्रमणाचा काळ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांचे राजकीय पुनर्वसन ही उद्धव यांची गरज आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा भरभक्कम बहुमत प्राप्त केलेल्या मोदी-शहांसोबत दोन हात करण्याचा धोका उद्धव पत्करणार नाहीत. आदित्य हेही आक्रमक राजकीय नेते नाहीत. त्यांच्या आवडीचे शिक्षण, नाइटलाइफ वगैरे विषय मार्गी लागले तर भाजपशी टक्करबिक्कर देण्याच्या चक्करमध्ये पडण्यात आदित्य यांना रस दिसत नाही. त्यामुळे युतीच्या जागावाटपात भाजपच्या १२३, तर शिवसेनेच्या ६३ जागा त्या दोन्ही पक्षांकडे राहतील. याखेरीज, अन्य पक्षांतून आलेल्या दोन्हीकडील नेत्यांची सोय लावली जाईल. त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या जागांचा विचार केल्यावर उरलेल्या ८० ते ९० जागांपैकी निम्म्या जागा हे दोन्ही पक्ष वाटून घेतील, अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे भाजप जवळपास १८० ते १९० जागा (अन्य मित्रपक्षांच्या जागांसह) लढवेल आणि शिवसेना १०० ते १०८ जागा लढवेल, असा अंदाज बांधला जात आहे. शिवसेनेने या जागावाटपाला मनापासून न स्वीकारता हसतमुखाने रुकार दिला, तर युती होईल. अर्थात, युती झाली तरी शिवसेनेला ६३ जागांपेक्षा खाली खेचणे, हा छुपा अजेंडा अमलात आणला जाणार, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता खरी परीक्षा शिवसेनेच्या सोशिकतेची आहे.

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

‘मनसे’ विधानसभा निवडणूक लढणार; पण स्वबळावर की आघाडीसोबत?

शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, स्वपक्षीयांमुळेच होणार कोंडी

होय, उद्धव ठाकरे अन् माझी 15 वर्षांनंतर भेट झाली, भास्कर जाधवांना 'कबूल' 

''भाजपकडे वॉशिंग मशीन; डागाळलेल्यांना गुजरातच्या निरमा पावडरने धुतो''

 

Web Title: Maharashtra Assembly Election: Shiv Sena has no other option but to compromise with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.