पोलिसांना मटण पार्टी देऊन पळालेला कुख्यात गुंड प्रिंस एनकाउंटरमध्ये ठार; सुबोध सिंहचा होता राईट हँड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:18 IST2026-02-06T18:16:07+5:302026-02-06T18:18:41+5:30
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला कुख्यात दरोडेखोर प्रिंस उर्फ अभिजीत कुमार याचा पोलिसांनी एनकाउंटरमध्ये खात्मा केला आहे.

पोलिसांना मटण पार्टी देऊन पळालेला कुख्यात गुंड प्रिंस एनकाउंटरमध्ये ठार; सुबोध सिंहचा होता राईट हँड
बिहारमधीलगुन्हेगारी विश्वाचा थरकाप उडवणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला कुख्यात दरोडेखोर प्रिंस उर्फ अभिजीत कुमार याचा पोलिसांनी एनकाउंटरमध्ये खात्मा केला आहे. वैशाली पोलीस आणि एसटीएफच्या संयुक्त कारवाईत प्रिंस मारला गेला, तर त्याचा एक साथीदार शस्त्रांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
धडाकेबाज कारवाई आणि चकमक
वैशालीचे एसपी विक्रम सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिंस हा सदर पोलीस ठाणे हद्दीतील दिघी येथील हनुमान नगरमधील एका घरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांनी परिसराला वेढा घातला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले असता, प्रिंसने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रिंस गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सदर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांना दिली होती मटण पार्टी
प्रिंस हा अत्यंत कुख्यात गुन्हेगार होता. २ सप्टेंबर २०२५ रोजी उपचाराच्या बहाण्याने तो रुग्णालयात आला होता. तिथे त्याने तैनात असलेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्मी स्टाईलने मटण पार्टी दिली. पोलीस जेवण्यात मग्न असताना त्याने त्यांना एका खोलीत कोंडले आणि तिथून पळ काढला. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. २०१७ मध्ये त्याने हाजीपूर न्यायालयात एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या देखील केली होती.
लूटमार टोळीचा मास्टरमाईंड
प्रिंस हा बिहारमधील सर्वात मोठ्या टोळीचा म्होरक्या सुबोध सिंह याचा अत्यंत जवळचा आणि शार्प शूटर मानला जात होता. त्याच्यावर लूटमार, हत्या आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत सुमारे ४० हून अधिक गुन्हे दाखल होते. या टोळीने देशभर धुमाकूळ घातला होता.
प्रिंसच्या मृत्यूने गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या लपंडावाचा शेवट झाला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली असून एफएसएल टीम तपास करत आहे. या कारवाईमुळे बिहारमधील गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे.