महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 06:22 IST2026-05-20T06:22:24+5:302026-05-20T06:22:59+5:30
१,२३,५०० रोजगार निर्मिती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ४ कंपन्यांशी सामंजस्य करार

महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अणुऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने मंगळवारी दमदार पाऊल टाकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चार कंपन्यांनी अणुऊर्जा निर्मितीसाठीचे सामंजस्य करार राज्य सरकारसोबत केले. यामध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ललितपूर पाॅवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज उद्योग समूह) यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवून देशात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्र पुरेपूर प्रयत्न करीत आहे. स्वच्छ ऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात अणुऊर्जानिर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीला अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, एनटीपीसी लिमिटेडचे ए. पी. सामल, अदानी पॉवरचे विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे रंजय शरण आदी उपस्थित होते.