८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:00 IST2026-05-02T15:59:32+5:302026-05-02T16:00:16+5:30
८ मुलांची आई आपल्या ५ मुलांच्या बापासोबत म्हणजेच जावयासोबत पळून गेली आहे.

AI Generated Image
आग्रा जिल्ह्यातील अछनेरा परिसरातून नात्यांच्या मर्यादांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ८ मुलांची आई असलेल्या सासूने स्वतःच्याच जावयासोबत पलायन केले आहे. विशेष म्हणजे, ज्या जावयासोबत ही महिला पळाली, तो जावईदेखील ५ मुलांचा बाप आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून "कलियुग दुसरं काय असतं?" अशी चर्चा आता ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.
मेहंदी तोडण्याच्या बहाण्याने बोलावले आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना एका घरगुती लग्नसमारंभादरम्यान घडली. आरोपी जावई आपल्या सासरी आला होता. दुपारच्या वेळी त्याने सासूला घरामागच्या शेतात 'मेहंदी' तोडण्याच्या बहाण्याने बोलावले. बराच वेळ झाला तरी दोघेही परतले नाहीत, म्हणून संशयावरून कुटुंबातील काही सदस्य तिथे पोहोचले. तिथे त्यांना सासू-जावई आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याचा आरोप आहे. घरच्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर गोंधळ सुरू झाला, त्याच गडबडीचा फायदा घेत जावयाने सासूला दुचाकीवर बसवले आणि तिथून रफूचक्कर झाला.
१२ वर्षांपूर्वीही केला होता असाच प्रताप
ही या सासू-जावयाची पहिलीच वेळ नाही, तर ही प्रेम कहाणी तब्बल १२ वर्षे जुनी असल्याचे समोर आले आहे. या कुटुंबातील दोन सख्ख्या भावांची लग्ने दोन सख्ख्या बहिणींशी झाली होती. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांतच थोरला जावई आणि सासू यांच्यात जवळीक वाढली होती. १२ वर्षांपूर्वीही हे दोघे घर सोडून पळून गेले होते. त्यावेळी दिल्लीतील एका कंपनीतून त्यांना शोधून आणण्यात आले होते. कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी तेव्हा हे प्रकरण दाबण्यात आले, पण त्यांच्यातील नाते संपले नव्हते.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
या अनैतिक संबंधांमुळे दोन हसती-खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ८ मुलांचा बाप असलेला पीडित पती आता धक्क्यात आहे. "ती त्याची सासू होती, नात्याची तरी चाड ठेवायची होती," अशा शब्दांत त्याने आपले दुःख व्यक्त केले. दुसरीकडे ५ मुलांची आई असलेल्या आरोपीच्या पत्नीचीही अवस्थाही अत्यंत बिकट झाली आहे. स्वतःची आईच नवऱ्याला घेऊन पळाल्याने तिच्यावर दुहेरी आघात झाला आहे.
पोलीस तपासात वेग
पीडित पतीने याप्रकरणी आपल्या जावयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जावयाने पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप त्याने अर्जात केला आहे. पोलीस ठाणे प्रभारी छोटे लाल यांनी सांगितले की, सासू आणि जावई बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.