खळबळजनक! ३ लग्न झालेल्या मैत्रिणीवर जीव जडला; प्रेमासाठी बायकोनेच नवऱ्याचा काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:42 IST2026-01-21T11:42:19+5:302026-01-21T11:42:54+5:30
पत्नीने आपल्या गर्लफ्रेंडसोबत मिळून पतीला संपवण्याचा कट रचला.

खळबळजनक! ३ लग्न झालेल्या मैत्रिणीवर जीव जडला; प्रेमासाठी बायकोनेच नवऱ्याचा काटा काढला
उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एका पत्नीने ६० हजारांची सुपारी देऊन आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे एका अन्य महिलेशी समलैंगिक संबंध होते. ही बाब पतीला समजल्यानंतर त्याने याला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पत्नीने आपल्या गर्लफ्रेंडसोबत मिळून पतीला संपवण्याचा कट रचला.
पतीला शेतात बोलावून तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला जमिनीवर पाडून त्याचा दोरीने गळा आवळला आणि नंतर गळा चिरून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पत्नी, तिची गर्लफ्रेंड यांच्यासह ३ जणांना अटक केली आहे. पत्नीने आपला गुन्हा कबूल केला असून, अन्य २ आरोपींचा शोध सुरू आहे. हे प्रकरण असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
चार दिवसांपूर्वी सापडला होता मृतदेह
१४ जानेवारी रोजी टीकर गावात शेतकरी सुमेर सिंह यांचा मृतदेह तुरीच्या शेतात सापडला होता. गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, सुमेर सिंह यांची पत्नी रेनू देवी हिचे मालती देवी नावाच्या महिलेशी दीड वर्षांपासून समलैंगिक संबंध असल्याचं समोर आलं. हे नातं इतकं घट्ट झालं होतं की, त्या दोघींनी एकमेकींसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला होता.
गर्लफ्रेंडची झाली होती तीन लग्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालती देवीची यापूर्वी ३ लग्नं झाली होती. तरीही ती वारंवार सुमेर सिंहच्या घरी येत असे. मालती आपला जास्तीत जास्त वेळ सुमेरची पत्नी रेनू सोबतच घालवत असे. जेव्हा ही गोष्ट सुमेर सिंह आणि त्याच्या घरच्यांना समजली, तेव्हा त्यांनी मालतीला घरी येण्यास आणि रेनूला भेटण्यास मज्जाव केला.
६० हजारात हत्येचा कट
हत्या करण्यासाठी मालतीने जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दी याच्याशी संपर्क साधला. सुमेर सिंहच्या हत्येची सुपारी एकूण ६० हजार रुपयांमध्ये ठरली. यापैकी ८ हजार रुपये रेनू देवीने मालतीमार्फत जितेंद्रला दिले. उरलेली रक्कम हत्या झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. घटनेच्या दिवशी जितेंद्र गुप्ता हा त्याचे साथीदार राजू सोनकर आणि रामप्रकाश यांच्यासह दबा धरून बसला होता. सुमेर सिंह शेतात पोहोचताच त्यांनी आधी दोरीने त्याचा गळा आवळला आणि नंतर चाकूने गळा चिरून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह तुरीच्या शेतात फेकून ते पसार झाले.
मोबाईल आणि हत्येत वापरलेली दोरी जप्त
पोलिसांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करत मालती देवी, सुमेरची पत्नी रेनू देवी आणि गुन्ह्यात सामील असलेला राजू सोनकर यांना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार जितेंद्र गुप्ता आणि त्याचा साथीदार रामप्रकाश अजूनही फरार आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून ३ मोबाईल फोन जप्त केले आहेत, ज्यांचा वापर कट रचण्यासाठी करण्यात आला होता. याशिवाय हत्येसाठी वापरलेली लाल रंगाची दोरीही जप्त करण्यात आली आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती एसपी अनूप सिंह यांनी दिली.