"१० मिनिटांत येतो...", आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस पण लेक आलाच नाही; खड्ड्याने घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:29 IST2026-02-07T12:28:33+5:302026-02-07T12:29:05+5:30
२५ वर्षीय कमल ध्यानी याचा गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली प्रशासनाने खोदलेल्या खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला.

"१० मिनिटांत येतो...", आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस पण लेक आलाच नाही; खड्ड्याने घेतला जीव
दिल्लीच्या जनकपुरी भागात झालेल्या एका भीषण अपघाताने एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. २५ वर्षीय कमल ध्यानी याचा गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली प्रशासनाने खोदलेल्या खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह आणि त्याची बाईक खड्ड्यात पडलेली आढळली. अपघाताच्या काही वेळ आधी कमलने आपल्या आई-वडिलांना फोन करून सांगितलं होतं की, तो अवघ्या १० मिनिटांत घरी पोहोचत आहे.
कमलने शुक्रवारी आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कामावरून सुटी घेतली होती. घरात कीर्तनाची तयारी सुरू होती आणि एका छोट्या पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबीय रात्रभर जागं राहून केकसह त्याची वाट पाहत होते, पण तो आलाच नाही. मित्र अल्ताफ आलमने एनडीटीव्हीला (NDTV) सांगितलं की, कमलने फोनवर आपल्या कुटुंबीयांना सांगितले होतं की तो १० मिनिटांत पोहोचेल. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला.
उघड्या खड्ड्याने घेतला जीव
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला होता, तिथे लाईट नव्हती, ना कोणताही इशारा देणारा बोर्ड होता, ना बॅरिकेडिंग. आता ज्या ठिकाणी ग्रीन नेट (हिरवी जाळी) आणि बॅरिकेड्स दिसत आहेत, तिथे गुरुवारी रात्री काहीच नव्हतं. हा प्रशासनाचा मोठा निष्काळजीपणा असल्याचं म्हटलं जात आहे.
मृत्यूचा सापळा! खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलीस म्हणाले, "२०० मीटरच्या परिसरात लोकेशन, शोधा"
कुटुंबीयांचा गंभीर आरोप
कमलच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्याला शोधण्यासाठी सागरपूर, डाबरी, मंगोलपुरी, जनकपुरी, पालम आणि रोहिणी यासह एकूण सहा पोलीस ठाण्यांच्या फेऱ्या मारल्या. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मदत केली नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर सकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी फोन करून एक मृतदेह सापडल्याचे सांगितलं. तो मृतदेह कमलचा होता.
दिल्लीच्या पालम भागात राहणारा २५ वर्षीय कमल एका खासगी बँकेत काम करत असे. त्याला खाण्याची खूप आवड होती. त्याचा मित्र अल्ताफने सांगितले की, तो अनेकदा मित्रांना घराशेजारी बिर्याणी आणि कॉफी पिण्यासाठी घेऊन जायचा. त्याचे वडील मंदिरात पुजारी आहेत. कमल हा घराचा मोठा आधार होता. या अपघातानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.