नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:01 IST2026-05-08T14:00:57+5:302026-05-08T14:01:45+5:30
कुटुंब आनंदाने फोटो काढून घेत होते. आता काही वेळातच सप्तपदी होणार होते. पण मंडपात असं काही घडलं की उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

फोटो - आजतक
लग्नाचा मंडप सजला होता, डीजेचा आवाज घुमत होता, पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत होते आणि स्टेजवर नवरदेव-नवरीने हसत-हसत एकमेकांना हारही घातले होते. दोन्ही कुटुंब आनंदाने फोटो काढून घेत होते. आता काही वेळातच सप्तपदी होणार होते. पण मंडपात असं काही घडलं की उपस्थित असलेल्या सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राजस्थानच्या कोटा येथील बोरखेडा परिसरात झालेल्या या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
नवरी मुलगी अचानक आपल्या संपूर्ण कुटुंबासह लग्नमंडपातून गायब झाली. नवरदेव स्टेजवर वाट पाहत राहिला, वऱ्हाडी हैराण झाले आणि काही वेळातच हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. आता दोन्ही पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. वर पक्ष याला लाखो रुपयांची फसवणूक म्हणत आहे, तर वधू पक्षाचं म्हणणं आहे की सप्तपूर्वी हुंड्याची मागणी करण्यात आली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हुंडा न घेता लग्नासाठी होकार
मिळालेल्या माहितीनुसार, साकेत आवास थेकडा येथील रहिवासी देवेंद्र सिंह याचं लग्न आदर्श नगर येथील मुस्कान कंवरसोबत ठरलं होतं. दोन्ही कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाची तयारी सुरू होती. वर पक्षाच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी हुंडा न घेता लग्नासाठी होकार दिला होता. इतकेंच नाही तर लग्नातील विविध विधी आणि तयारीसाठी त्यांनी आर्थिक मदतही केली होती. लग्नाचा खर्चही मुलाच्या कुटुंबानेच उचलला होता.
नवरीसोबत कुटुंबीय देखील गायब झाले
नवरी सप्तपदीसाठी तयार होण्यासाठी खोलीत गेली होती. बराच वेळ होऊनही ती परत आली नाही, तेव्हा कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळानंतर समजलं की नवरीसोबत तिचे कुटुंबीय देखील गायब झाले आहेत. सुरुवातीला लोकांना वाटलं की कदाचित काही कामासाठी बाहेर गेले असतील, पण बराच वेळ कोणीच न आल्याने खळबळ उडाली. मुलाचे कुटुंबीय तात्काळ मुलीच्या घरी पोहोचले, पण तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. घराला कुलूप होतं.
दागिन्यांवरून दोन्ही कुटुंबात वाद
नवरदेवाचे वडील स्वरूप सिंह यांनी आरोप केला आहे की, हा संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला. मुलीच्या कुटुंबाने विश्वास संपादन करून लग्न ठरवलं आणि विधींच्या नावाखाली पैसे उकळले. पण सप्तपदी आधीट पळून गेले आहेत. बोरखेडा पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, वधू पक्षानेही तक्रार दाखल केली आहे. वर पक्षाकडून हुंड्याची मागणी करण्यात आली होती, असा त्यांचा आरोप आहे. दागिन्यांवरून दोन्ही कुटुंबात वाद झाला आणि तणाव वाढल्याने त्यांनी हे लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा वधू पक्षाने केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.