"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:35 IST2026-05-08T14:29:55+5:302026-05-08T14:35:29+5:30
Vijay TVK: केंद्र सरकारकडून राज्यपालांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जात असताना तामिळनाडूच्या लोकभवनने केलेल्या विधानाने विजय यांची चिंता वाढवली आहे. सर्वाधिक जागा जिंकलेल्या टीव्हीकेला अजून बहुमतांचे गणित जुळवता आलेले नाही.

"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय यांच्या टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी बोलवायला हवे होते, अशी चर्चा एक चर्चा तामिळनाडूमध्ये सुरू आहे. त्यातूनच राज्यपालांवर केंद्र सरकारचा दबाव असल्याचे आरोप होत असून, लोकभवनाने यावर भाष्य करताना थेट बहुमताच्या मुद्द्यावर बोट ठेवले. ज्याच्याकडे बहुमत असेल, त्यांना सत्ता स्थापन करण्यास परवानगी दिली जाईल, असे लोकभवनने म्हटले आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्यात आघाडी होण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर राज्यपालांच्या कार्यालयाकडून आलेल्या विधानाने विजय आणि टीव्हीके यांच्या पक्षाचे टेन्शन वाढवले आहे.
तामिळनाडूमध्ये सत्तेसाठी खेळ रंगला आहे. १०८ जागा जिंकूनही विजय यांच्या टीव्हीकेला सत्ता स्थापन करण्यात अद्याप यश आलेले नाही. कारण टीव्हीके पक्षानंतर ज्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, त्या दोन्ही पक्षांविरोधातच ते लढले आहेत. द्रमुक आणि अण्णाद्रमुक वगळता इतर कोणत्याही पक्षाला दोन अंकी आमदार निवडून आणता आलेले नाही आणि त्यामुळेच गुंता निर्माण झाला आहे.
सत्ता स्थापनेला उशीर, राज्यपालांवर टीका
सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यायला हवे. त्यानंतर विजय हे बहुमत सिद्ध करतील, पण राज्यपालांकडून मुद्दाम दिरंगाई केली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यावर राज्यपालांचे कार्यालय असलेल्या तामिळनाडूच्य लोकभवनने आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे की, ज्याच्याकडे बहुमत असेल, त्यांना सरकार स्थापन करू दिले जाईल.
लोकभवनाच्या भूमिकेची वेळ
अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांची आघाडी उदयास येण्याची चर्चा सुरू झाली असताना लोकभवनकडून हे विधान करण्यात आल्यानं शंका व्यक्त होत आहे. गुरुवारी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली तेव्हा टीव्हीके शिवाय दुसऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण देणार नाही, असे राज्यपालांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले होते. पण, आता नव्याने मांडण्यात आलेल्या भूमिकेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
१०७ आमदार राजीनामे देतील, टीव्हीकेचा इशारा
तामिळनाडूमध्ये महाविकास आघाडीसारखा प्रयोग होण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येणार, अशा चर्चा सुरू झाल्यानंतर टीव्हीकेने आक्रमक पवित्रा घेतला. दुसऱ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलावले, तर टीव्हीकेचे १०८ आमदार राजीनामे देतील असा इशारा विजय यांच्या पक्षाने दिला आहे.