Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:35 IST2026-05-08T14:33:40+5:302026-05-08T14:35:06+5:30
Chandranath Rath Murder Case Updates: पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खाजगी सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला आणि सीआयडीला अनेक खळबळजनक पुरावे हाती लागले आहेत.

Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे खाजगी सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला आणि सीआयडीला अनेक खळबळजनक पुरावे हाती लागले. चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यासाठी बिहारमधून दोन शार्प शूटर्स बोलवण्यात आले आणि त्यांना ४० लाख रुपयांची सुपारी देण्यात आली, अशीही माहिती समोर येत आहे. यामुळे हा केवळ हत्या नसून पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन दिवसांनी चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मध्यमग्राम चौमाथ्याजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेल्मेट घातलेले दोन तरूण संशयास्पद रितीने पळून जाताना दिसत आहेत. हत्येनंतर आरोपींनी कोलकाता विमानतळावरून बनावट ओळखपत्रांच्या आधारे राज्याबाहेर पळ काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बिहारच्या शूटर्सना राहण्याची सोय आणि वाहने एका स्थानिक गुन्हेगाराने पुरवली होती. हत्येसाठी वापरलेली एक मोटारसायकल बिधाननगरमधील शोरूमबाहेरून चोरण्यात आली. तिचे इंजिन आणि चेसिस नंबर बारासातमधील एका गॅरेजमध्ये बदलण्यात आले. दुसऱ्या एका दुचाकीचा क्रमांक सिलीगुरीच्या विपाश दत्ता नावाच्या व्यक्तीचा होता, मात्र पोलिसांना तपासात ती व्यक्ती बनावट असल्याचे किंवा कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे आढळले आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना सुवेंदू अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले असून, तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले आहे. सध्या पोलीस एका महिलेसह अनेक संशयितांची चौकशी करत आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले असून, लवकरच या कटामागील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.