प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:44 IST2026-05-05T12:42:43+5:302026-05-05T12:44:05+5:30
मुरादाबादमध्ये १३ वर्षांपूर्वी झालेल्या दीड वर्षाच्या मुलीच्या हत्येप्रकरणी कोर्टाने मुख्य आरोपी मुकेशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक हत्याकांडाचा निकाल अखेर लागला आहे. दीड वर्षाच्या चिमुरडीची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रेमप्रकरण आणि त्यातून निर्माण झालेल्या सुडाच्या भावनेतून एका निष्पाप जिवाचा बळी घेणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा सर्वांच्या अंगावर काटा आणला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे सुन्न करणारे प्रकरण मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानपुर नारायणपुर गावातील आहे. २०१३ मध्ये राजू नावाच्या व्यक्तीची दीड वर्षांची मुलगी वर्षा घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली होती. बराच शोध घेऊनही ती सापडली नाही, मात्र काही काळानंतर गावाजवळील एका तलावात तिचा मृतदेह तरंगताना आढळला. शवविच्छेदन अहवालात तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आणि संपूर्ण जिल्हा हादरला.
सूडाचा प्रवास: प्रेमप्रकरण आणि थोरल्या भावाची चूक
पोलीस तपासात या हत्येमागे जे कारण समोर आले, ते अत्यंत धक्कादायक होते. या हत्येची मुळे एका प्रेमप्रकरणात होती. तक्रारदार राजू आणि त्याचा भाऊ धर्मेंद्र हे मुख्य आरोपी विजेंद्र याच्या घरी भाड्याने राहायचे. यादरम्यान विजेंद्रची मुलगी ज्योती आणि धर्मेंद्र यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ज्योतीचे लग्न झाल्यानंतरही धर्मेंद्रने तिचा पिच्छा सोडला नव्हता. एकदा तर तो तिला घेऊन पळून गेला होता. या प्रकारामुळे विजेंद्रचे कुटुंब समाजात प्रचंड अपमानित झाले होते.
निष्पाप वर्षावर काढला राग
धर्मेंद्रवर असलेल्या रागाचा बदला घेण्यासाठी विजेंद्र आणि त्याच्या साथीदारांनी अत्यंत नीच मार्ग निवडला. धर्मेंद्रला धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्याच्या भावाच्या, म्हणजेच राजूच्या दीड वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले. २४ एप्रिल २०१३ रोजी चिमुकली वर्षा खेळत असताना तिचे अपहरण करण्यात आले आणि सुडापोटी तिचा गळा आवळून तिला मृत्यूच्या दारात ढकलण्यात आले.
कोर्टाचा मोठा निकाल
या प्रकरणात विजेंद्र, मुकेश आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यादरम्यान एका आरोपीचा मृत्यू झाला, तर पुराव्याअभावी एकाची सुटका करण्यात आली. मात्र, एडीजे-४ न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपी मुकेश याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. १३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वर्षाच्या कुटुंबाला न्याय मिळाला.