मराठवाड्यात पाणीसंकट गडद! ८ दिवसांत मोठ्या धरणांतील साठा २०० दलघमीने घटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 14:45 IST2026-05-12T14:40:11+5:302026-05-12T14:45:01+5:30
"पाण्याचा वापर जपून करा!" जायकवाडीसह ११ मोठ्या प्रकल्पांत केवळ ५४% साठा; वाढती मागणी आणि बाष्पीभवनाने जलसंपदा विभागाची चिंता वाढली.

मराठवाड्यात पाणीसंकट गडद! ८ दिवसांत मोठ्या धरणांतील साठा २०० दलघमीने घटला
छत्रपती संभाजीनगर : गेल्या महिन्यापासून मराठवाड्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. या पार्श्वभूमीवर धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढत असून पाण्याचा वापरही वाढत असल्याने मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांतील जलसाठा मागील आठ दिवसांत २०० दलघमीने कमी झाला आहे.
पावसाळा सुरू होण्यास अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. असे असले तरी यंदा ‘एल निनो’मुळे कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. मराठवाड्यात मोठ्या आकाराची ११ धरणे आहेत. या धरणांत आज ५४ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. तर मध्यम स्वरूपाच्या ७५ प्रकल्पांत केवळ ३३ टक्के, तर लघुपाटबंधारे धरणांत सरासरी २५ टक्केच पाणीसाठा उरला आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांची सरासरी सिंचन क्षमता ५१५६ दशलक्ष घनमीटर (दलघमी) आहे. गतवर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या धरणांत सरासरी ४२२७ दलघमी पाणीसाठा जमा झाला होता. मागील आठवड्यात या धरणांमध्ये २६३४दलघमी पाणीसाठा होता. या सर्वच धरणांतील पाणी सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरले जाते. उन्हाळी पिकांचे क्षेत्र अत्यल्प असते. सिंचनापेक्षा पिण्यासाठी अधिक पाण्याची गरज असते. दोन ते तीन दिवसांपासून तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. याचा फटका थेट धरणातील पाण्याला बसत असल्याचे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील आठ दिवसांतील पाण्याचा वापर आणि बाष्पीभवन यामुळे जायकवाडीसह सर्वच मोठ्या धरणांतील जलसाठा २४००दलघमीपर्यंत खाली आला. मागील आठ दिवसांत मोठ्या धरणाचा साठा २०० दलघमीपर्यंत घटला.
धरणांची संख्या आणि आजचा सरासरी जलसाठा
मोठी धरणे- ११--- ४६टक्के
मध्यम धरणे- ७५---३३ टक्के
लघुप्रकल्प---७५८----२५ टक्के
उच्चपातळी बंधारे ३५--- ३३ टक्के