'एका लग्नाहून दुसऱ्या लग्नाकडे जाताना घात झाला!'; पत्नीसमोरच पतीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:44 IST2026-04-30T14:42:00+5:302026-04-30T14:44:12+5:30
झाल्टा फाट्यावरील विवाह आटोपला, पण कोलठाणवाडी गाठण्यापूर्वीच काळाने गाठले; सुसाट ट्रकने दांपत्याचा संसार उध्वस्त केला.

'एका लग्नाहून दुसऱ्या लग्नाकडे जाताना घात झाला!'; पत्नीसमोरच पतीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: शहर पळशी येथील रहिवासी अस्लम उस्मान शेख (३५) हे पत्नी शमा यांच्यासह नातलगांच्या विवाह सोहळ्यासाठी निघाले असताना केम्ब्रिज-सावंगी बायपासवरील गोपाळपूर शिवारात रविवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर काळाने घाला घातला. समोरून आलेल्या सुसाट ट्रकने (MH 25 AJ 6041) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अस्लम यांचा ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी शमा या दूरवर फेकल्या गेल्यामुळे सुदैवाने बचावल्या.
दोन लग्नांमधील दुर्दैवी प्रवास
अस्लम शेख हे खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. २६ एप्रिल रोजी झाल्टा फाटा येथील एका लग्नाचे कार्य आटोपल्यानंतर हे दांपत्य कोलठाणवाडी येथील दुसऱ्या एका विवाह सोहळ्याकडे जात होते. मात्र, वाटेतच सुसाट ट्रकने त्यांच्या आनंदावर विरजण घातले. या अपघातामुळे अस्लम यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि पत्नी असा परिवार उघड्यावर पडला आहे.
चालक फरार, गुन्हा दाखल
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. शमा शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात संबंधित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या पसार चालकाचा शोध घेत आहेत.