तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:31 IST2026-05-10T14:30:25+5:302026-05-10T14:31:44+5:30
५० फूट खोल विहिरीत नादुरुस्त मोटार सुरू करून कट्याला पाणी मारण्यास खाली उतरलेल्या तिन्ही बाप लेकांच्या अंगावर १४ कडे आणि मातीचा ढिगारा पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
श्यामकुमार पुरे
सिल्लोड - ५० फूट खोल विहिरीत नादुरुस्त मोटार सुरू करून कट्याला पाणी मारण्यास खाली उतरलेल्या तिन्ही बाप लेकांच्या अंगावर १४ कडे आणि मातीचा ढिगारा पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील शेतवस्तीत असलेल्या विहिरीवर शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
बाजीराव सर्जेराव काकडे वय ४९ वर्ष ( वडील), श्याम बाजीराव काकडे, वय २२ वर्ष, अजिनाथ बाजीराव काकडे, वय २६ वर्ष सर्व रा.धानोरा ता सिल्लोड असं मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. धानोरा येथील शेतकरी बाजीराव काकडे यांच्याकडे १२ एक्कर शेती आहे. धानोरा गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेतातील शेतवस्तीतच ते राहत होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम काम सुरू होते.
जमिनीपासून ५० फूट खोलपर्यंत या विहिरीला खडक लागले नव्हते. सर्व मातीच माती होती पण तिला पाणी चांगले असल्याने तिला कडे टाकण्याचे काम सुरू होते. १४ कडे टाकण्यात ही आले होते विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी विहिरीत मोटार टाकण्यात आली होती. मात्र मोटारमध्ये बिघाड झाल्याने बिघाड कशामुळे झाला हे बघण्यासाठी दोरीच्या साहायाने तिन्ही बाप लेक शनिवारी रात्री ९.३० वाजता विहिरीत उतरले व अचानक विहिरीचे नवीन बांधलेले १४ कडे व २५ फूट मातीचा ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर कोसळला याघटनेत तिघे मातीच्या ढिगाराखाली दबून जागीच ठार झाले.
रात्री १२ वाजले तरी तिघे बाप लेक घरी परत आले नाही म्हणून बाजीराव यांची पत्नी मीराबाई विहिरी जवळ गेली असता त्यांना हा प्रकार दिसला त्यांनी लगेच आरडाओरडा करून गावात नातेवाईकांना सांगितले. रात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत दोन जेसीबी व दोन पोकलेंड मार्फत मातीचा ढिगारा उपसून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तिघांना सकाळी ७.३० वाजता सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिघांना तपासून मृत घोषित केले.
सकाळी शवविच्छेदन करून धानोरा गावात रविवारी सकाळी ११.३० वाजता शोकाकुल वातावरणात तिघांच्या मृतदेहांवर तीन ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले. बाजीराव काकडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक सून असा परिवार आहे. तर अजिनाथ यांचे लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. तर श्याम हा अविवाहित होता.