मराठवाडा तहानला! ९२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकर्सचे पाणी; ३ लाख नागरिकांची वणवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:14 IST2026-05-07T17:12:20+5:302026-05-07T17:14:18+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर्स सुरू; वाढत्या तापमानामुळे जलसाठे तळाला, मराठवाड्यात पाणीबाणी.

मराठवाडा तहानला! ९२ गावे आणि ३६ वाड्यांना १५६ टँकर्सचे पाणी; ३ लाख नागरिकांची वणवण
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ग्रामीण भागाला वाढत्या तापमानाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विभागात कमाल तापमान ४० ते ४२ अंशांच्या आसपास नाेंदविले जात आहे. त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होत आहे. विभागातील ९२ गावे आणि वाड्यांमध्ये १५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मे महिना लागल्यामुळे हा आकडा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर या तीन जिल्ह्यांतील गावांमध्ये सध्या टँकर सुरू आहेत. यात ३६ वाड्यांचा समावेश आहे. सुमारे तीन लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टँकर सध्या सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरसाठी ३७, टँकर व्यतिरिक्त ४७ मिळून ८४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे, तर जालन्यात ४२ व लातूरमध्ये २४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यासंह २६८ विहिरी ताब्यात आहेत. १५६ खासगी, तर पाच शासकीय टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे.
लघु व मध्यम प्रकल्पात कमी साठा...
विभागातील ७५ मध्यम प्रकल्पात सध्या ४२ टक्के, तर ७५८ लघु प्रकल्पात सध्या ३२ टक्के पाणीसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये सुमारे ५३ टक्के जलसाठा आहे. विभागात ४८ टक्क्यांपर्यंत जलसाठा सध्या आहे.
जिल्हा.................... गावे/वाड्या ......... टँकर
छत्रपती संभाजीनगर .... ८५ ......... ११५
जालना .................. ३९ ........... ३८
हिंगोली ................. ०१ .......... ०१
लातूर ................. ०२ .............. ०२
एकूण ................. १२७ ............. १५६
यंदा चांगला पाऊस पडेल....
मे अखेरपर्यंत कोरडे व उष्ण हवामान राहील. उष्णता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर मान्सूनचे आगमन होणे शक्य आहे. जून व जुलै महिन्यांत विजांच्या कडकडाटासह व गारांसह पाऊस होईल. यंदा चांगला व समाधानकारक पाऊस होईल.
-प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक