पैठण (औरंगाबाद) : भानुदास एकनाथ असा जयघोष करत टाळमृदंगाच्या गजरात सायंकाळच्या (६.३५ वा.) सुमारास गुरुवारी शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पादुका असलेली पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पालखीस निरोप देण्यासाठी गागाभट चौकातील पालखी ओटा परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. १९ दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूर येथे पोहचणार आहे.
पालखी संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरातून मार्गस्थ होताच ठिकठिकाणी भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. मराठवाडा, खान्देश भागातील वारकरी पंढरपूर आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोबत मोठ्या संख्येने जातात. यामुळे रविवार दुपारपासून विविध वाहनाने जालना, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जळगाव आदी भागातील वारकरी पैठण शहरात दाखल झाले होते. शहरातील विविध मठात वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
आज दुपारी बारा वाजता पालखीप्रमुख रघुनाथ बुवा गोसावी हे शेकडो वारकऱ्यांसह शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेण्यासाठी गावातील नाथवाड्यात दाखल झाले. यावेळी टाळ मृदगांच्या निनादात, धन्य आज दिन संत दर्शनाचा हा अभंग घेण्यात आला. पादुका पालखीत ठेऊन पालखी पंरपरेनुसार गावातील मंदीरातून संत एकनाथ महाराज यांचा जयघोष करत बाहेरील नाथ समाधी मंदीरात गेली. तेथे भाविकांनी भक्ती भावाने समाधी दर्शन घेऊन पालखी भाविकांच्या दर्शनासाठी गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर ठेवण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर पालखी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.
पालखीस निरोप देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत घोडके, विलास भुमरे, नंदलाल काळे, सुरज लोळगे, शेखर शिंदे, सुचित्रा जोशी, नीता परदेशी, चंद्रशेखर पाटील, सोमनाथ परदेशी, निमेश पटेल, , रेखाताई कुलकर्णी, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, पवन लोहीया, संजय कोरडे, शिवा पारवे, प्रा संतोष गव्हाणे, शाम लोहिया , दिलीप मगर , ,रघुनाथ ईच्छैया, शिवा पारिख, सोमनाथ परळकर, सोमनाथ भारतवाले, भिकाजी आठवले , दत्ता फासाटे, , अनिल घोडके, तुषार पाटील, सुनिल रासणे, दिनेश पारिख , विजय चाटुपळे ,महेश जोशी ,बजरंग लिंबोरे ,उमेश पंडुरे, राजू टेकाळे , भूषण कावसानकर, कृष्णा मापारी, ईश्वर दगडे, संतोष सव्वासे, अश्विनी लखमले, कांचन लेंभे, सचिन ज्योतिक, संतोष धापटे, विजय चाटुपळे, सतिश आहेर, संभाजी सव्वाशे, पंकज चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. पालखीस निरोप देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, पोलीस उपअधिक्षक विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, तहसीलदार दत्ता निलावाड, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, आदीसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
वारकऱ्या प्रती सेवाभाव...
संत एकनाथ महाराज दिंडीत सहभागी वारकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य पथक, तीन पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत. जि.प. माजी सभापती विलास भुमरे यांच्यातर्फे साहित्य ठेवण्यासाठी वारकऱ्यांना रेक्झीन बैग वितरीत करण्यात आल्या. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी रेनकोटचे वाटपही करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते शाम लोहिया यांच्या वतीने दिंडी मार्गावर वारकऱ्यांसाठी मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना सुविधा पुरविण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घेतल्याचे आज दिसून आहे.