तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:49 IST2026-04-24T13:47:22+5:302026-04-24T13:49:19+5:30
Tulsi Lakshmi Vastu Tips: तुळस बहुगुणी मानली गेली आहे. बहरलेली तुळस भरभराटीचे, समृद्धीचे लक्षण मानले जाते. जाणून घ्या...

तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Tulsi Lakshmi Vastu Tips: भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की, दररोज तुळशीची पूजा केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात. तुळशीचे आशीर्वाद मिळतात. पौराणिक मान्यतेनुसार, तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप आणि भगवान विष्णूंचे प्रिय मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक होते, असे म्हटले जाते. परंतु, तुळशीच्या शेजारी काही गोष्टी अजिबात ठेवू नये, या गोष्टी तुळशीच्या बाजूला ठेवल्या, तर लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते, असे मानले जाते.
तुळस बहुगुणी मानली गेली आहे, म्हणूनच ती भगवान महाविष्णूंना, विठोबाला, जगन्नाथाला, श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. तुळस हे लक्ष्मीचेच रूप. तुळशीची पूजा केली, की लक्ष्मी प्रसन्न होणार आणि लक्ष्मी प्रसन्न झाली, की लक्ष्मीपतींची कृपादृष्टी नक्कीच होणार असे म्हटले जाते. ज्या घरात, दारात तुळशीचे रोप फोफावले असते, बहरले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. तुळशी माहात्म्य सांगावे, तेवढे थोडेच आहे. त्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत.
तुळशीच्या रोपाची दिशा कोणती हवी? चुकली असेल तर...
तुळशीचे रोप नेहमी उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला असावे. तुळशीचे रोप चुकीच्या दिशेने ठेवल्यास फायदा होत नाही, असे मानले जाते. केवळ घरात तुळशीचे रोप लावणे पुरेसे नाही, तर त्याची रोज पूजा आणि सेवाही करावी. रोज सकाळी नित्यकर्म करून तुळशीला जल अर्पण करावे, सायंकाळी दिवा लावावा, असे सांगितले जाते. शक्य असल्यास दुधात जलार्पण करावे.
घरातील तुळशीच्या बाजूला काही गोष्टी चुकूनही ठेवू नये
भगवान विष्णूंची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही. त्यात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावल्याने जीवनात सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते. बहरलेली तुळस आपल्या दारात, अंगणात, खिडकीत, गॅलरीत असणे हे भरभराटीचे लक्षण मानले जाते. मात्र, घरातील तुळशीच्या बाजूला काही गोष्टी चुकूनही ठेवू नये, असे सांगितले जाते. अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी ओढावली जाऊ शकते. लक्ष्मी देवी घरातून निघून जाऊ शकते, असे म्हटले जाते. याचे मोठे नुकसान सोसावे लागू शकते, असेही सांगितले जाते.
घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना?
तुळशीच्या आजूबाजूला केर, अस्वच्छ भांडी, पादत्राणे किंवा कचरा चुकूनही ठेवू नका. तुळशीच्या झाडावर घाण पाणी कधीही पडणार नाही, याची व्यवस्था करावी. अन्यथा धनहानी सहन करावी लागू शकते. अनेक समस्याही येऊ शकतात, असे सांगितले जाते. तुळशीभोवती काटेरी झाडे लावू नका. त्याने घरात नकारात्मकता वाढू शकते. जेथे तुळशीचे रोप लावले असेल, त्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप लावू नये. तुळशीचे रोप टेरेसवर ठेवू नका. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत ठेवावे. दिवेलागणीला तुळशीला सांजवात केल्यानंतर विझलेला दिवा काढायला विसरू नका, असा सल्ला दिला जातो.
- सदर माहिती गृहीतके आणि सामान्य मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते.