यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत विजय मिळवून दमदार सुरुवात केली होती. मात्र नंतर संघाची कामगिरी ढेपाळली असून, काल रात्री वानखेडेवर झालेल्या लढतीत मुंबईला चेन्नई सुपरकिंग्सकडून तब्बल १०३ धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या लढतीत २०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आणि मुंबईचा संपूर्ण संघ १०४ धावांत गारद झाला. आता आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात पाच पराभव आणि २ विजयांसह मुंबईचा संघ ४ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, या सुमार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला आता संघाबाहेर असलेल्या आपल्या सिनियर फलंदाजाची आठवण येत असून, त्याच्या अनुपस्थितीत मुंबईच्या फलंदाजीची ताकद निम्माने घटल्याचे बोलले जात आहे.
माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने सांगितले की, मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. चांगल्या सुरुवातीविना २१०-२२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणं खूप कठीण होतं. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या याने आतापर्यंत म्हणावं तसं योगदान दिलेलं नाही. तिलक वर्माने मागच्या सामन्यात शतकी खेळी केली होती, मात्र इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमरा आणि अल्लाह गजनफर चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र त्यांना इतरांकडून चांगली साथ मिळण्याची आवश्यकता आहे.
रोहित शर्मा याने २०२६ मध्ये आयपीएलमधील मोहिमेची सुरुवात दणक्यात केली होती. त्याने कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३८ चेंडूत ७८ धावा कुटून काढल्या होत्या. मात्र चौथ्या सामन्यात दुखापत झाल्याने तो संघाबाहेर गेला. तसेच मागच्या काही सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्माची अनुपस्थिती मुंबईला प्रकर्षाने जाणवली आहे.