तहसीलदार ते जिल्हाधिकारी; अविनाश पाठकाचा ‘खेळ’ खल्लास, असा झाला ७३ कोटींचा ‘गेम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:24 IST2026-05-09T11:19:56+5:302026-05-09T11:24:20+5:30
बीडच्या भूसंपादन प्रक्रियेत सिस्टिम हायजॅक करून ७३ कोटींचे वाटप; आयपीएस एम. व्यंकटराम यांची मोठी कारवाई.

तहसीलदार ते जिल्हाधिकारी; अविनाश पाठकाचा ‘खेळ’ खल्लास, असा झाला ७३ कोटींचा ‘गेम’
बीड : ज्या जिल्ह्यावर १५ वर्षे ‘एकछत्री अंमल’ गाजवला, ज्या प्रशासकीय यंत्रणेला आपल्या ताटाखालचे मांजर बनवून ठेवले, त्याच सिस्टिमने अखेर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यास अटक केली आहे. एका बनावट सहीच्या जोरावर सरकारी तिजोरीवर ७३ कोटींचा डल्ला मारणाऱ्या पाठकाचा बीडमधील प्रदीर्घ सत्तेचा खेळ आता अखेर खल्लास झाला असून, ‘कर्मा रिटर्न्स’चा प्रत्यय संपूर्ण जिल्ह्याला येत आहे.
अविनाश पाठक याने बीड जिल्ह्यामध्ये तब्बल १५ वर्षे सेवा केली आहे. तहसीलदार पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जिल्हा पुरवठा अधिकारी, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असा करत थेट जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचला. जिल्ह्यातील प्रत्येक विभागावर आणि राजकारण्यांवर त्याची मजबूत पकड होती. मात्र, हेच प्रदीर्घ वास्तव्य आणि प्रशासनावरील पकड आता ७३ कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याच्या रूपाने त्याच्या अंगलट आली आहे.
असा झाला ७३ कोटींचा ‘गेम’
बीड जिल्ह्यातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गांच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो. अविनाश पाठक २२ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी पदावरून बदली होऊन गेले. मात्र, त्यानंतरही त्याने जुन्या तारखांचे बनावट आदेश काढले. ६८ कोटींचा मूळ मोबदला चक्क ३१० कोटी २० लाखांवर नेण्यात आला. यातून ७३ कोटी ४ लाख रुपये प्रत्यक्षात वाटले गेले. सरकारी रेकॉर्डमध्ये कोणतीही अधिकृत नोंद नसताना हे पैसे वाटले गेले, जणू काही संपूर्ण सिस्टिमच हायजॅक केली होती.
कॉल रेकॉर्डिंग आणि तांत्रिक पुरावे
तपास यंत्रणांच्या हाती अडीच हजारांहून अधिक कॉल रेकॉर्डिंग लागले आहेत. हस्ताक्षरतज्ज्ञांच्या अहवालात या सह्या पाठक याच्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीएस एम. व्यंकटराम यांच्याकडे तपास येताच हालचालींना वेग आला आणि ७ मे २०२६ रोजी पाठकांना लातूरमधून ताब्यात घेतले.
बीड जिल्ह्यातून हे महामार्ग जातात?
बीड जिल्ह्यातून सध्या अनेक महत्त्वाचे दळणवळण प्रकल्प जात असून, जिल्ह्याचे जाळे राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले आहे. यामध्ये धुळे-सोलापूर, जामखेड-अहमदपूर, पाथरडी-परळी, पैठण-पंढरपूर, शेगाव-पंढरपूर, कल्याण-विशाखापट्टणम आणि सुरत-चेन्नई या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. यासोबतच नव्याने प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग देखील जिल्ह्यातून जाणार आहे. रस्ते मार्गांशिवाय अत्यंत महत्त्वाकांक्षी असा नगर-बीड-परळी हा रेल्वेमार्गही जिल्ह्यातून जात असून, या सर्व प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यातही घोटाळा झाल्याचा संशय आता यानिमित्ताने व्यक्त होत आहे.