चांदूर रेल्वेतील अशोक महाविद्यालयाच्या प्राचार्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:01:17+5:30
लॉकडाऊनच्या काळात अनुराग हा १५ दिवसांपूर्वी पळसखेड आला होता. संबंधित मुलीचे आईवडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत आहे, असे सांगत असल्याचे अनुरागने त्याच्या वडिलांना सांगितले. २ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक अनुरागची तब्येत अचानक बिघडली. त्याला पळसखेड येथून अमरावती येथे आणत असल्याची माहिती अनिल जगनाडे यांना फोनद्वारे मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : तालुक्यातील पळसखेड येथील अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी अनुराग अनिल जगनाडे (१९) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चांदूर रेल्वे येथील अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य जयंत कारमोरे यांना शनिवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी मृताचे वडील अनिल जगनाडे यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजता जयंत कारमोरे, साहिल राज ठाकरे व एका मुलीविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
अनुरागने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पळसखेड येथे घडली होती. दोन वर्षांपूर्वी अनुरागचे एका मुलीशी प्रेमसंबध जुळले. या प्रकरणात प्राचार्य कारमोरे व अन्य दोघांनी आपल्या मुलाची मानसिक छळवणूक केली. संबंधित मुलगीदेखील अनुरागवर दबाव टाकायची. त्या छळाला कंटाळून अनुरागने आत्महत्या केली, असे अनिल जगनाडे यांनी नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, पळसखेड येथील मूळ रहिवासी अनिल जगनाडे हे मुलांच्या शिक्षणासाठी अमरावती येथे राहतात. त्यांचा मुलगा अनुराग हा प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्गाला होता. सन २०१८ मध्ये अनुराग बारावीमध्ये अमरावती येथे शिकत असताना, एका शिकवणी वर्गात त्याची एका मुलीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले. याबाबत माहिती होताच जयंत कारमोरे अनुरागच्या अमरावती येथील घरी दोन तीन वेळा मद्यपान करून आले व त्यांनी अनुरागसह त्यांच्या कुटुंबीयांना दमदाटी केली तसेच अनुरागला जिवे मारण्याची धमकी दिली. कारमोरे यांच्यामुळे दडपणाखाली येऊन अनुराग दोन दोन दिवस घरी येत नव्हता.
यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जयंत कारमोरे संबंधित मुलीसह पोलिसांना घेऊन अनुरागच्या घरी आले. याप्रसंगी पोलिसांनी दोघांकडून एकमेकांना पुन्हा भेटणार नाही, असे लिहून घेतले. मात्र, त्यानंतरही त्या मुलीचे कॉल, मेसेज येत आपल्या मुलाला येत राहिले, असे अनिल जगनाडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात अनुराग हा १५ दिवसांपूर्वी पळसखेड आला होता. संबंधित मुलीचे आईवडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत आहे, असे सांगत असल्याचे अनुरागने त्याच्या वडिलांना सांगितले. २ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक अनुरागची तब्येत अचानक बिघडली. त्याला पळसखेड येथून अमरावती येथे आणत असल्याची माहिती अनिल जगनाडे यांना फोनद्वारे मिळाली. ते जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहोचले. त्यावेळी रक्तवाहिनीमधून विषारी औषध घेतल्याने अनुरागचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. घटनेच्या वेळी अनिल जगनाडे हे अमरावतीत होते. त्यांच्या शेजाऱ्यांनी अनुरागला अत्यवस्थ स्थितीत इर्विनमध्ये आणले होते, तर गावातील एका इसमाने जगानाडे यांना याबाबत माहिती दिली होती.
घरात सापडली सुसाईड नोट
पळसखेड येथील राहत्या घरी अनुरागने इंग्रजीमध्ये पोलीस उपायुक्त व राजापेठ (अमरावती) पोलीस ठाण्याच्या नावाने लिहिलेली मृत्युपूर्व चिठ्ठी मिळाली. संबंधित मुलगी, साहिल राज ठाकरे हे मेसेज व कॉल करून दबाव टाकून सतत मानसिक छळ केल्याचे त्यात नमूद आहे. त्यांच्यासह जयंत कारमोरे यांनी संगनमत करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची लेखी तक्रार मृताचे वडील अनिल जगनाडे यांनी दिली. कारमोरे यांना शनिवारी दुपारी वर्धा येथून अटक करण्यात आली. ठाणेदार दीपक वानखडे, पीएसआय राहुल चौधरी, गणेश मुपडे, हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण शिरसाट, शेख गणी यांनी ही कारवाई केली.