ट्रकची धडक, हवेत उडाला आणि चाकाखाली चिरडला संकेत; एक गंभीर, तर दोन किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 19:22 IST2026-01-26T19:21:32+5:302026-01-26T19:22:34+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात झेंडावदन करून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला ट्रकने उडवले. त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकची धडक, हवेत उडाला आणि चाकाखाली चिरडला संकेत; एक गंभीर, तर दोन किरकोळ जखमी
राहुरी (अहिल्यानगर) : कॉलेजमध्ये झेंडा वंदन करून घरी परतणाऱ्या दोन कॉलेज तरुणांच्या दुचाकीला भरधाव मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. सोमवारी (26) शहरातील गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर झालेल्या या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. दरम्यान, शहरातील दुसऱ्या ठिकाणी (बस स्थानकासमोर) झालेल्या दुसऱ्या अपघातात आणखी दोन तरुण किरकोळ जखमी झाले.
काही मिनिटांतच शहरात दोन अपघात होऊन एक तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर तर दोन जण जखमी झाले असून त्याच्यावर राहुरीतील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
गौटुंबा आखाडा (ता. राहुरी) येथील संकेत सखाराम बाचकर (वय १८) व श्रीकांत हापसे हे दोघे २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास राहुरी कॉलेज येथे झेंडा वंदन करून दुचाकीवरून घरी निघाले होते.
ट्रकच्या चाकाखाली आला आणि जीव गेला
गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर मालट्रकने (टी.एन. २९ बी झेड ३३८१) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. धडकेमुळे संकेत रस्त्यावर फेकला गेला आणि दुर्दैवाने मालट्रकच्या चाकाखाली सापडला. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने संकेतचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत हापसे गंभीर जखमी असून त्याच्यावर राहुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संकेतच्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार असून वडील सखाराम बाचकर हे स्कूल बस चालक म्हणून काम करतात.
आयशर टेम्पोची दुचाकीला धडक
दरम्यान, याच वेळेस राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात घडला. कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे (वय १८) व सार्थक कैलास आहेर (वय १९) हे दोघे दुचाकीवरून कानडगावहून डोंगरगणकडे जात असताना आयशर टेम्पोने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिली.
या अपघातात प्रसाद गागरे गंभीर जखमी झाला असून सार्थक आहेर किरकोळ जखमी झाला आहे.एकाच दिवशी नगर–मनमाड राज्य महामार्गावर दोन ठिकाणी घडलेले अपघात म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा जिवंत पुरावा असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
‘भरधाव अवजड वाहनांवर नियंत्रण कुणाचे?’, ‘हा महामार्ग अजून किती निष्पापांचे बळी घेणार?’ असा सवाल करत मयत व जखमी तरुणांच्या नातेवाईकांसह ग्रामीण नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.