जिल्ह्यात एसटी महामंडळात दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:10+5:30
महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचे दिसून येते. विशिष्ट लोकांसाठी परिपत्रकाचा वापर कठोरतेने होत आहे, तर मर्जीतील लोकांवर मेहेरबानी दाखविली जात असल्याची ओरड आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकार नियंत्रणात आणावा, अशी अपेक्षा अन्यायग्रस्त कर्मचाºयांकडून होत आहे.
गेली काही दिवसांपासून महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा कारभार बेताल सुरू आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. या सर्व प्रकारात महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. विभागीय कार्यालयातील अनेक शाखांमधील कामकाज अक्षरश: ढकलले जात आहे. हिशेबात चुका करून काही लोकांना जादा रक्कम दिल्याचे प्रकार घडत आहे. यावर कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमधील दिरंगाईचा प्रकार झपाट्याने वाढत आहे.
महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे. या परिपत्रकाचे अधिकाऱ्यांनी स्वागत करताना एकाच मार्गावर जाणाऱ्या काही लोकांचा रूट बदलविला. मात्र दुसरीकडे विशिष्ट लोकांना यातून सूट देण्यात आली. यवतमाळ-नांदेड, यवतमाळ-औरंगाबाद यासह काही ठिकाणच्या रात्रमुक्कामी बसेसवर तेच ते कर्मचारी ड्यूटीवर जात आहे.
या बाबी विभागीय कार्यालयाच्या निदर्शनास कशा येत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांकडूनही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली जाते. पांढरकवडा प्रशिक्षण केंद्रातील प्रकाराने ही बाब स्पष्ट झाली आहे. आर्थिक देवाणघेवाण प्रकरणात लिपिकाला निलंबित करण्यात आले. एका अधिकाऱ्याचे नाव स्पष्टपणे घेतले जात असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही. लहान कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण यवतमाळ विभागातील अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.
यवतमाळात ‘बसफेऱ्या रद्द’चा आजार
यवतमाळ आगारातील अनेक बसफेऱ्या रद्द केल्या जात आहे. तिकीट मशीनचा तुटवडा, बसेसची अपुरी संख्या, चालक-वाहक उपलब्ध नसणे आदी कारणे या मागे सांगितली जातात. वास्तविक ही सर्व परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतात. त्या दुरुस्त करून घेण्यात संबंधित अधिकाऱ्यांची इच्छाशक्तीच नसल्याचे बोलले जात आहे.