लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना काही महत्वाच्या पदावरील कर्मचारी अपडाऊन करतात. यासोबतच मुख्यालयी राहण्याचा घरभाडे भत्ता, एकस्तर वेतनश्रेणी आणि वाहतूक भत्ताही उचलतात. यासंदर्भातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिक्षण विभाग त्यामध्ये आघाडीवर आहे. तलाठी तर निवासस्थाने असतानाही मुख्यालयी राहत नाही. ग्रामसेवक अपडाऊनच करतात. तर कृषी सहाय्यकांची असंख्य पदे रिक्त असल्याने एकाच कृषी सहाय्यकांकडे अनेक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. घरभाडे भत्यासाठी नऊ हजार कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला चार कोटींची तरतूद केली जाते. मात्र जिल्हा परिषदेचे सात हजार ४५६ शिक्षक, ६३० ग्रामसेवक, ४२१ कृषी सहायक आणि शेकडो तलाठी मुख्यालयी न राहताच घरभाडे भत्ता उचलत आहेत. आता जनता याबाबत प्रशासनाला जाब विचारण्याच्या तयारीत आहे.
शिक्षण विभाग कार्यालय, यवतमाळशिक्षण विभागात सात हजार ४५६ शिक्षक कार्यरत आहे. यातील सर्वच शिक्षक घरभाडे भत्ता उचलतात. बाहेरगावावरून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या शिक्षकांचा आकडा मोठा आहे. स्वत:चे घर असतानाही मुख्यालयातील काही कर्मचारी घरभाडे उचलतात. सरकारी तिजोरीला फटका बसला आहे.
पंचायत विभाग कार्यालय, यवतमाळपंचायत विभागात ६३० ग्रामसेवक आहेत. यातील बहुतांश ग्रामसेवक तालुका अथवा शहरातून ये-जा करतात. सर्वच ग्रामसेवक घरभाडे भत्ता उचलतात. घरभाडे भत्ता उचलण्यासाठी शासकीय नियम असतानाही या नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे गावपातळीवरील कामकाजही प्रभावित झाले आहे.
कृषी विभाग कार्यालय, यवतमाळकृषी विभागात विविध योजनांची अंमलबजावणी आणि नुकसानीचे सर्वेक्षण करणारे ४२१ कर्मचारी आहेत. यातील बहुतांश कर्मचारी रिक्त पदामुळे मुख्यालयाच्या मध्यभागी भाड्याने राहतात आणि बहुतांश सर्वच कर्मचारी घरभाडे भत्ता उचलतात. या कर्मचाऱ्यांना मिळणारा प्रवास भत्ता त्या तुलनेत अपुरा पडतो.