वाहन चोरांच्या टोळीतील आठ अटकेत, १४ वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:09+5:30
शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव (२१), राहूल किसन कुरसंगे (२५) सर्व रा. आसोला या सहकाऱ्यांची नावे सांगितली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील प्रमुख दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने दुचाकी चोरीचे गुन्हे घडत आहे. याच पार्श्वभूमीवर अवधूतवाडी व शहर पोलिसांच्या शोध पथकाला मोठे यश हाती लागले. दोन टोळ्यांकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव (२१), राहूल किसन कुरसंगे (२५) सर्व रा. आसोला या सहकाऱ्यांची नावे सांगितली. तसेच धामणगाव-नागपूर बायपासजवळ पुलाखाली लपवून ठेवलेल्या चोरीच्या आठ दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात, सहायक निरीक्षक रामकृष्ण भाकडे, गजानन क्षीरसागर, रवी आडे, अमित कदम, मिलिंद दरेकर, अल्ताफ शेख, अंकुश फेंडर, राजकुमार कांबळे यांनी केली.
दरम्यान अवधूतवाडी ठाण्यातील शोध पथकालाही भोसा परिसरात एका ठिकाणी सहा दुचाकी ठेऊन असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाळत ठेऊन तेथे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी शहरातूनच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तर चोरलेल्या चार दुचाकीचे सुटे भाग भंगारात विकल्याचे सांगितले. ही कारवाई ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात शोध पथकाचे सहायक निरीक्षक विवेक देशमुख, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सुधीर पुसदकर, सलमान शेख, सागर चिरडे यांनी केली. सुटे भाग विकत घेणाऱ्या विक्रेत्याचा शोध पोलीस घेत आहे. या दोन्ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या. सातत्याने दोन्ही ठाण्यांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद होत असल्याने टीका होत असलेल्या पथकांनी दुचाकी चोरीचा उलगडा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. घरफोड्यांचे मात्र आव्हान कायम आहे.